
मारवड : महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दिनांक १४ ते २८ जानेवारी या कालावधीत दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जात असतो. या प्रयोजनार्थ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मराठी विभाग मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘कवी कट्टा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वसंत देसले होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील मुला-मुलींनी सहभागी होऊन आप-आपल्या कवितांचे सादरीकरण केले. त्यात प्रथम वर्ष कला वर्गातील नाजमीन पठाण, अश्विनी महाजन, पुनम भिल, व्दितीय वर्ष कला वर्गातील प्रताप भिल, गणेश मोरे आणि तृतीय वर्ष कला वर्गातील प्राजक्ता निकम, किरण साळुंखे इ. विद्यार्थ्यांनी कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमास माजी आदर्श विद्यार्थी नरेंद्र पाटील याने उपस्थिती दिल्याबद्दल त्याचा यथोचित सत्कार करून, सर्वांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. सुत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ.संजय पाटील यांनी तर आभार डॉ.दिलीप कदम यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.