डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पूजन झाले पाहिजे : मुख्याध्यापक अनिल महाजन

अमळनेर : तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी तर ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी माल्यार्पण केले. इयत्ता आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये आठवी ते दहावी तील एकूण ३४ विद्यार्थी, विद्यार्थिनी नी सहभाग घेतला. यात,.. प्रथम : कु. गायत्री रतिलाल भिल (इयत्ता दहावी), द्वितीय : कु. सोनाली महाजन, मयुरी महाजन, रागिणी पाटील, उन्नती गायकवाड, प्रियंका महाजन यांच्या समूह गीतास, तृतीय : कु. श्वेता गौतम बैसाणे(इयत्ता दहावी), उत्तेजनार्थ : कृष्णा संजय पाटील, शिवम रतिलाल भिल (इयत्ता आठवी) बक्षीसास पात्र ठरले. सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना आय.आर.महाजन सर यांच्याकडून एका कार्यक्रमात बक्षीसे दिली जाणार आहेत. परीक्षक म्हणून एच.ओ. माळी यांनी काम पाहिले.
मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिणार तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,’ असे डॉ. बाबासाहेब समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना त्यांच्या विचाराचे पूजन व्हावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्काऊट शिक्षक एस. के. महाजन, एस. ओ. माळी, क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.