अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

अमळनेर (साने गुरुजी साहित्य नगरी) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर मध्ये होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य संमेलनाच्या कार्यामध्ये प्रत्येकाने स्वखुशीने काम करुन अ.भा.मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये आपला हातभार लावावा. सर्वांनी तन मन धनाने साहित्य संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन अमळनेर येथे जी.एस.हायस्कूलमध्ये झालेल्या सहविचार सभेत धुळे येथील प्रकाश पाठक यांनी मार्गदर्शन करतांना केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची जी.एस. हायस्कूल येथे काल सहविचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे होते. डॉ. अनिल शिंदे व निरज अग्रवाल यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अमळनेर नगरीत असे साहित्य संमेलन होणं आपले भाग्य असल्याने साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवावे, त्यासाठी प्रत्येकाने स्वतः आपली जबाबदारी सांभाळून साने गुरुजींच्या कर्मभूमीचा नावलौकिक करावा असे आवाहन केले.
यावेळी खानदेश शिक्षण मंडळ शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जी.एस. हायस्कूलचे चेअरमन हरी भिका वाणी, प्रा. प्रकाश पाठक, धुळे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन जी.एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील सर यांनी मानले. यावेळी मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, श्रीमती स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, सौ वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. सौ. शीला पाटील, अजय केले, बजरंग अग्रवाल उपस्थित होते.