हिंदी अध्यापक मंडळाचा सामान्य ज्ञान परीक्षेचा तालुकास्तरीय बक्षीस वितरण समारंभ व जीवन गौरव पुरस्काराचे वितरण संपन्न

अमळनेर : हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शहादा, जि. नंदुरबार आयोजित हिंदी दिनानिमित्त (१४ सप्टेंबर) आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ व जीवन गौरव सन्मान सोहळा नुकताच साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख अतिथी हिंदी मंडळाचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील, युनियन बँक शहादा चे शाखाप्रबंधक मयूर पाटील, निम हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक तथा जीवन गौरव पुरस्कारार्थी ए. पी. चव्हाण, हिंदी मंडळाचे जिल्हा पदाधिकारी एन.आर चौधरी, मनीष उघडे, हिंदी मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे, सचिव दिलीप पाटील, माजी तालुकाध्यक्ष तथा मार्गदर्शक दिपक पवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्शुलकर, साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक राजेंद्र पाटील, प्रतिभा जाधव, मुख्याध्यापक प्रकाश पाटील अनिल चौधरी सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व मान्यवरांचे स्वागत गीताने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी हिंदी अध्यापक मंडळाचे ध्येय.. हिंदी भाषेचा दर्जा वाढविणे आणि विद्यार्थ्यांना त्याच्यातील संधींचा लाभ घेण्यासाठी सक्षम करणे हा हेतू असल्याचे सांगितले. तालुक्यातून ग्रामीण व शहरी लहान – मोठा गटामधून ५७२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात विशेष बाब म्हणून भडगाव तालुक्यातील सर्वोदय माध्यमिक विद्यालय, गुढे या विद्यालयाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्रामीण भागातून ३२ शाळांनी तर शहरी भागातून २२ शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातून लहान – मोठा गट मिळून ३६ विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने विजेता मधून निवडले गेले आहे व तालुक्यातील ३२ शिक्षकांना उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी निम हायस्कूल चे सेवानिवृत्त हिंदी शिक्षक ए. पी. चव्हाण यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह, मेडल, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याशिवाय साने गुरुजी शिक्षक पतपेढीमध्ये हिंदी मंडळाचे पदाधिकारी निवडून आल्याबद्दल व मंडळाचे पदाधिकारी मुख्याध्यापक पदी रुजू झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप घोरपडे म्हणाले की, सामाजिक संवाद आणि सांस्कृतिक आदान प्रदानासाठी भाषा एक महत्त्वाचा घटक आहे. हिंदी भाषा, ज्याला भारतातल्या महत्त्वाच्या भाषांपैकी एक मानले जाते, त्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समाज माध्यमातून अनेक व्यक्तींनी आपले विचार व्यक्त केले आहेत. हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

मार्गदर्शन करताना शहादा येथील युनियन बँकेचे शाखा प्रबंधक मयूर पाटील म्हणाले की, हिंदी भाषा टिकवण्यासाठी प्रत्येकाने या भाषेच्या संवर्धनासाठी आपली प्रामाणिक भूमिका निभावली पाहिजे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांचा यात सहभाग वाढवावा लागेल, जेणेकरून हिंदी भाषेला उज्ज्वल भविष्य मिळू शकते. यामुळे भारतीय संस्कृती, एकता आणि समृद्धीला चालना मिळेल. विद्यार्थ्यांना संबोधित करतांना शिक्षकांचा आदर आणि त्यांचे बलिदान यावर भर दिला. ‘गुरू एक मार्गदर्शक असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांची आत्मा उजळते’. समारंभात विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्याच्या योजनेसाठी थोडा वेळ देऊन शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. आपल्याला शिक्षणासाठी मिळवलेले ज्ञान एकट्यासाठी वापरुन चालणार नाही. आपल्याला हे ज्ञान समाजाच्या विकासासाठी वापरावे लागेल,’ असेही त्यांनी सांगितले. यापुढे हिंदी अध्यापक मंडळाला दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाला आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

स्वामी समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा हिंदी मंडळाचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील यांनी दोन महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा केली आहे. पहिला उपक्रम म्हणजे हिंदी भाषेतील साहित्यिक कार्यशाळा, ज्यात विद्यार्थ्यांना लेखनाची कला शिकवली जाईल. दुसरा उपक्रम म्हणजे ‘हिंदी संवाद मंच’, जिथे विद्यार्थ्यांना हिंदीत संवाद साधण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांची बोली भाषेत सुधारणा होईल. याशिवाय, यांनी स्थानिक शाळांमध्ये ‘हिंदी अध्ययन महोत्सव’ आयोजित करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना हिंदी साहित्य आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास करता येईल. त्यांनी सामुदायिक सहभागाच्या महत्त्वावरही जोर दिला आहे कारण समाजातील प्रत्येक व्यक्तीला हिंदी भाषेच्या विकासात योगदान द्यायला हवे. विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या प्रसारात सामिल करण्यात आल्यास, भविष्यात त्यांची विचारशक्ती आणि संवाद कौशल्ये अधिक विकसित होईल यात शंका नाही.

जीवनगौरव पुरस्कारार्थी ए. पी. चव्हाण यांनी हिंदी मंडळाचे धन्यवाद व्यक्त करत मंडळासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी हिंदी मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार सदस्य डॉ किरण निकम,योगश्री पाटील, प्रतिभा साबे, यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव दिलीप पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर मार्गदर्शक दीपक पवार, जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर.चौधरी, तालुकाध्यक्ष आशिष शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्शुलकर, सचिव दिलीप पाटील, सहसचिव कमलाकर संदानशिव, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन, प्रतियोगिता पुरस्कार समिती मुनाफ तडवी, प्रदीप चौधरी सदस्य डॉ. किरण निकम, श्रीमती प्रतिभा जाधव, श्रीमती मंगला चव्हाण, श्रीमती कविता मनोरे, श्रीमती योगश्री पाटील, प्रशांत वंजारी, श्रीमती प्रतिभा सावे, सुनील पाटील सह हिंदी शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!