रोटरी क्लब तर्फे विद्यार्थ्यांना वाचनाचे आवाहन

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : तालुक्यातील गांधली पिळोदा ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मोबाईल मुक्त संध्याकाळ’ या संकल्पनेअंतर्गत नाविन्यपूर्ण पाऊल टाकत जिल्हा परिषद शाळा गांधली-पिळोदा येथे नुकताच दि.२५ ऑगस्ट रोजी बाल वाङ्मय विभाग सुरू करण्यात आला. रोटे. विवेक देशमुख यांनी त्यांचे वडील स्व. शिवाजीराव गुलाबराव देशमुख यांच्या स्मरणार्थ या ग्रंथालयासाठी ५ हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये वाचन कमी होत असल्याने, त्याला पर्याय म्हणून वाचनाची आवड बालपणापासूनच व्हावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे. हा प्रकल्प रोटरी क्लब अमळनेर द्वारा राबविण्यात आला.
या प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांना दर आठवड्याला एक पुस्तक नियमित वाचनासाठी देण्यात येणार असून, वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा सत्र व नोंदवही ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पुस्तकांमध्ये महापुरुषांचे पराक्रम त्यांनी केलेले थोर कार्य व त्यांचा इतिहास आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाचनासोबतच त्यांचे ज्ञानात भर पडेल अशी अपेक्षा आहे. तरी विद्यार्थ्यांनी याच्या जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब, अमळनेर तर्फे करण्यात आल्याचे मकसूद बोहरी यांनी कळविले आहे. कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश पाटील, रोटे. विवेक देशमुख, सरपंच नरेंद्र पाटील, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील, अंगणवाडी सेविका, आशाताई, महिला बचत गटाच्या सदस्या तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.