आता कोरोनाचा नायनाट हा अमळनेरकरांच्याच हाती : आमदार अनिल पाटील

अमळनेर : शहरात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता आमदार अनिल पाटील यांनी उद्या (ता.६) सकाळी १० वाजता प्रांताधिकारी सिमा अहिरे यांच्या दालनात तातडीची प्रशासकीय बैठक बोलाविली असून आज पासून पुढील ५ दिवस स्वयंघोषीत कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व आरोग्य विभाग यांनी प्रचंड मेहनत व उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रभाव कमी न होता उलट मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता झालेली गंभीर परिस्थिती जनतेलाच हाताळायची असून यामुळे अत्यावश्यक सेवा देखील पुर्णपणे ५ दिवस बंद ठेवण्याची गरज आहे. यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
यापुढे कोणीही बाहेरगांवी जाणे, बाहेरगावाहून अमळनेरात आणणे या संदर्भातल्या अडचणी तसेच इतर खाजगी समस्या तुर्तास स्थगित ठेवुन कोणत्याही पद्धतीचा आग्रह आमदार अथवा प्रशासनाकडे करु नये. प्रत्येकाने स्वतःला शिस्त लावून घरातच थांबावे, आता कोरोनाचा नायनाट हा अमळनेरकरांच्याच हाती असल्याचे भावनात्मक आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे संकेत प्रशासनाने देत या जनता कर्फ्युला प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी देखील दुजोरा दिला आहे. दरम्यान शहरातील सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, सामाजिक संस्था, मंडळाचे पदाधिकारी यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपापल्या भागातील नागरिक १००% जनता कर्फ्युचे पालन करतील याची दक्षता घ्यावी असे आवाहनही आ.अनिल पाटील यांनी केले आहे.