अमळनेर : अमळनेर मतदारसंघाचा गेल्या पन्नास वर्षांतील विकासाचा अनुशेष विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार शिरीषदादा चौधरी यांनी भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराने सरकार सतारुढ होणार असून यापुढे ही अमळनेर तालुक्यात विकासाची गंगा सुरू राहण्यासाठी शिरीषदादा यांना पुन्हा निवडून आणा. जाती पातीचे नाही तर विकासाचे राजकारण करणारा आमदार निवडून द्या असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी केले.
भाजप, शिवसेना, आर.पी.आय, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या प्रचारार्थ ता.१४ रोजी येथील भगवा चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेत्या अँड. ललिताताई पाटील, डॉ. रविबापू चौधरी, लालचंद सैनानी, हरचंद लांडगे, श्याम पाटील, नगरसेवक सलीम भाई, गटनेते प्रवीण पाठक, नगरसेवक विनोद पाटील, आर.पी.आय चे श्याम संदानशिव, माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील, चाळीसगावचे भाजप तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, सुनील भामरे, संजय पाटील, मनोज पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेला मोठी गर्दी होती. आमदार शिरीषदादा चौधरी, अँड. ललिताताई पाटील यांनीही आपल्या भाषणातून भाजपाला साथ देण्याचे आवाहन केले.

