पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांना निवेदन

जळगाव : अमळनेर येथील पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांना पाडळसरे धरण निम्न तापी प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत होऊन धरणाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे या मागणीचे निवेदन जळगावच्या हॉटेल प्रेसिडेंट येथे नुकतेच देण्यात आले. खा.उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून ना.नितीनजी गडकरी यांची समितीच्या कार्यकर्त्यांसोबत भेट झाली. यावेळी आ.राजुमामा भोळे, मा.आ.शिरीष चौधरी, मा.आ.स्मिताताई वाघ यांचेसह भाजप चे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, ‘जळगाव, धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असलेले निम्न तापी पाडळसरे धरण २२ वर्षांपासून संथ गतीने सुरू असून राज्य शासनाला ठोस निधीबाबत मर्यादा असल्याने सदर प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण व्हावा याकरिता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा. सदर प्रककल्पाबाबत आपण लक्ष घालून उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा’ अशीही मागणी करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी ना. नितीनजी गडकरी यांनी समितीच्या सदस्यांना, निम्न तापी प्रकल्प संदर्भातील सविस्तर माहिती मागवून त्यात वैयक्तिक लक्ष घालून या धरणाला प्राधान्य देतो असे आश्वासित केले. यावेळी धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, सुनील पाटील, मनोज पाटील सोबत जन आंदोलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते अजयसिंग पाटील, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, महेश पाटील, हेमंत भांडारकर, देविदास देसले, रामराव पवार, गोकुळ बागुल, डी.के.पाटील, साहेबराव पवार, अनिल कासार, संजय पूनाजी पाटील, एस.आर.बोहरेकर, बाळू पाटील, माधव पाटील, नारायण बडगुजर, गोपालभाई पटेल आदी अमळनेर व चोपडा येथिल उपस्थित होते. कार्यकर्त्यांसह “पाडळसे धरण झालेच पाहिजे” या घोषणांच्या टोप्या घातलेले जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.