अमळनेर येथे होणाऱ्या ९७ वे मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. गिरीश महाजन यांनी घेतला तयारीचा आढावा

आतापर्यंत झाले नसेल असे संमेलन करून दाखविण्याचा निर्धार व्यक्त

अमळनेर (साने गुरुजी साहित्य नगरी) : येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून संमेलनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी येण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे देखील समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात दिनांक २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी ९७ वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. गिरीश महाजन यांनी आज अमळनेर येथे येऊन साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी संमेलनाच्या विविध ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली. आतापर्यंत झाले नसेल असे संमेलन करून दाखवायचं आहे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रताप महाविद्यालयात झालेल्या बैठकीत बोलतांना ना. महाजन म्हणाले की, संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष आहे. या संमेलनात कुठलीही कमी राहता कामा नाही, याची आपण दक्षता घेवू. आतापर्यंत झाले नसेल असे संमेलन करून दाखवायचं आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सर्वजण आपल्या सोबत आहेत, कोणीही काळजी करु नये. तुम्ही सर्वजण कामाला लागा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना दिले. संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्र्यांनी येण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी बैठकीतून थेट ना.गडकरी यांना फोन लावून चर्चा केली. चर्चेनंतर गडकरी यांनी येण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीला माजी आमदार शिरीष चौधरी, मराठी वाङ्‌मय मंडळ अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंग अग्रवाल यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्यउपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सदस्य हरी वाणी, डॉ. संदेश गुजराथी, कल्याण पाटील, विनोद पाटील, निरज अग्रवाल, योगेश मुंदडे, चिटणिस प्रा. डॉ. ए. बी. जैन, सहचिटणिस प्रा. डॉ. डी. आर. वैष्णव, प्रा. आर. एम. पारधी, विनोद मधुकर पाटील तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व श्री.गायकवाड उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!