कार्याध्यक्षपदी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे

जळगाव : अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर काल जळगांव येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्यध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी व राज्यउपाध्यक्ष अर्जुन बागुल यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशसंघटक श्याम पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांची निवड घोषित केली. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक धनदाई कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. लिलाधर पाटील, संयोजक साहित्यिक मिलिंद बागुल तर मुख्य समन्वयक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, इकरा एज्युकेशन सोसायटीचे करीम सालार असतील. निमंत्रक म्हणून अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे हे असतील.

अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन धुळे रोड वरील आर. के. नगर समोरील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत भरविले जाईल. स्वातंत्र्य सेनानी सानेगुरुजी यांचा “खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे” हा मानवतावादी संदेश तसेच संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संदेश विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंचावरून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
गेली १७ वर्षे विद्रोही साहित्य संमेलनांनी विषमतावादी व जातीयवादी शक्तींच्या विरोधात ठाम भूमिका घेतलेली आहे. देशातील सध्याच्या हुकूमशाही व भांडवलशाहीच्या काळात साहित्यिक, माध्यमांची होणारी मुस्कटदाबी या पार्श्वभूमीवर हे संमेलन महाराष्ट्रातील एक महत्त्वाची सांस्कृतिक साहित्यिक घडामोड ठरणार आहे. अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन सांस्कृतिक आणि राजकीय दहशतवादाला आव्हान देणारे कला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील अभिव्यक्तीचे विचारपीठ म्हणून काम करेल. हे साहित्य संमेलन लोकशाही , समतावादी आणि स्वाभिमानी विचारांचा स्विकार करते असेही यावेळी सांगण्यात आले. विद्रोही मराठी साहित्य संमेलन ही १९९९ मध्ये स्थापन झाल्यापासून जात-वर्ग-वर्चस्ववादी, भांडवलशाही पुरुषसत्ताक मूल्य संस्कृतीच्या विरोधात उभी असलेली एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक चळवळ आहे असेही यावेळी यांनी सांगितले. याप्रसंगी अमळनेर विद्रोही स्थानिक समिती अध्यक्ष गौतम मोरे , लेखक कवी डॉ. सत्यजित साळवे, प्रा.डॉ.देवेंद्र इंगळे, विद्रोहीचे कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे, जळगांव ग. स. बँकेंचे संचालक राम पवार, सुरेश पाटील, सुरेंद्र पवार, दयाराम पाटील सर, लेखक बळवंत भालेराव, वसंत सपकाळे, प्रा.यशवंतराव मोरे, एस. पी. ठाकूर, नारायण वाघ, तुषार सावंत, संभाजी पाटील, संदीप पाटील, प्रफुल पाटील, फहिम अहमद पटेल, भाऊराव इंगळे, रमेश सोनवणे, उमाकांत ठाकूर, प्रा.प्रितीलाल पवार ,विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.