विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, एन.सी.सी. चे विद्यार्थी व खानदेशी रक्षक फाउंडेशनचे आजी-माजी सैनिकांनी साजरा केला कारगिल विजय दिवस

शहरात शोभा रॅली काढून अमर जवान स्मारकाला वाहिली पुष्पांजली

अमळनेर : कारगिल युद्धातील विजयाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. हा दिवस म्हणजे भारताच्या स्वाभिमान, पराक्रम आणि विश्वासाचं प्रतिक आहे. भारतमातेच्या वीर सुपुत्रांनी कारगिल युद्धात दाखविलेल्या शौर्या बद्दल २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. अमळनेर येथे एन.सी.सी. चे विद्यार्थी व खानदेशी रक्षक फाउंडेशनचे आजी-माजी सैनिकांनी शोभा रॅली काढून आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. शोभा रॅली पुढे आर्मी ओपन जिप्सी व त्यावर तिरंगा लावण्यात आला होता.

कारगिल विजय दिवस शोभा रॅली श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह – सुभाष चौक – तिरंगा चौक – महाराणा प्रताप चौक – श्री छत्रपती शिवाजी नाट्यगृह येथे येऊन समारोप करण्यात आला. यावेळी ४९ एन, सी, सी बटालियनचे C O साहेब यांनी तिरंगा चौक येथे अमर जवान स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण आदरांजली वाहिली. उपस्थित एनसीसी चे विद्यार्थी व खानदेश रक्षक फाउंडेशनचे आजी-माजी सैनिक यांनीही अमर जवान स्मारकाला पुष्पांजली वाहिली. अनेकांनी युद्धातील हुतात्म्यांच्या त्यागाला विनम्र अभिवादन केले. यावेळी आजी- माजी सैनिक विजय सुर्यवंशी, धनराज पाटील, विलास महाले, ईश्वर चौधरी, रामकृष्ण पाटील, प्रविण पाटील, शशीकांत वाघ, विनोद पाटील, ढवरे मेजर, स्वप्निल शिरसाठ, भुषण डी. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी भारतीय सशस्त्र दलातील सर्व जवानांना शुभेच्छाही दिल्यात.

विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर

विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘२५ वा कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला. प्राचार्य व्ही. जी. बोरसे अध्यक्षस्थानी होते. प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील, पालक प्रतिनिधी शरद बानकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर आर्मी स्कूलच्या बंदूकधारी छोट्या जवानांनी शहिदांना मानवंदना दिली. यावेळी सैन्य दलात अधिकारी म्हणून सेवा देणारे नागराज पाटील, श्रीराम पाटील, भटू पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्राचार्य पदी व्ही. जी. बोरसे यांची पदोन्नती झाल्याबद्दल ही सत्कार करण्यात आला. उपशिक्षक व्ही. डी. पाटील, विद्यार्थी विष्णू पावरा व सम्राट मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश पवार याने सूत्रसंचालन केले तर पवन पाटील याने आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!