उप भूमी अभिलेख कार्यालय येथे घेतली सदिच्छा भेट

अमळनेर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे दिनांक १२ डिसेंबर २४ रोजी येणाऱ्या ग्राहक दिनानिमित्त (२४ डिसेंबर) अमळनेेर येथील तहसीलदार रुपेश कुमार सुराणा व पुरवठा अधिकारी सौ. रुखसाना शेख यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार यांच्यावतीने श्री ए. पी. कुलकर्णी यांनी निवेदन स्विकारले. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्षा सौ. स्मिता चंद्रात्रे, महिला प्रांत प्रमुख ॲड. भारती अग्रवाल, जिल्हा पालक मकसूद बोहरी, तालुका संघटक सौ. ज्योती भावसार, जिल्हा बँकिंग प्रमुख विजय शुक्ला व जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख सुनील वाघ, जिल्हा उपसचिव सतीश देशमुख सर आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षी ठराविक शासकीय अधिकाऱ्यांना ग्राहक संघटनांना आमंत्रित केले जात असते. परंतु यावर्षी आमंत्रितांमध्ये ग्राहकांची जास्त अडवणूक होत असते असे क्षेत्र उदाहरणार्थ मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी, ब्रॉडबँड , डीटीएच सेवा देणारे स्मार्टफोन्स, चॅनलचे व ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपनी चे प्रतिनिधी, बँका, फायनान्स कंपनीचे तसेच इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी, व्यापारी व उद्योजकांचे मेडिकल व केमिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी आणि बांधकाम व्यवसाय असोसिएशनचे प्रतिनिधी आदींना सदर कार्यक्रमास आमंत्रित करावे. तसेच वरील सर्व उद्योग क्षेत्रात जर ग्राहकांना संपर्क करावयाचा असेल तर फक्त ऑनलाईन पद्धत किंवा कस्टमर केअर नंबर एवढीच सुविधा उपलब्ध आहे. व्यक्तीचे नाव त्यांचे फोन नंबर व अधिकृत पोस्टल पत्ता सहजासहजी उपलब्ध होत नाही. ग्राहक संरक्षण कायदा अत्यंत सक्षम व प्रभावी असूनही ग्राहकास न्याय मिळण्यास अतिशय विलंब होत असतो. यासाठी या सर्व उद्योगातील व्यवसायिकांना आमंत्रित करून त्यांच्या समस्यांचे निराकरण व त्यांचे आर्थिक शोषण थांबवण्यास मदत होऊ शकते. त्या अनुषंगाने या कार्यक्रमास ग्राहकांचे हक्क व त्यांची जबाबदारी याची त्यांना जाणीव करता येऊ शकते असे आम्हास वाटते. शासनाने या निवेदनाचा सकारात्मक विचार करावा असेही या निवेदनात म्हटले आहे.
तसेच याप्रसंगी उप भूमी अभिलेख (सिटी सर्वे) कार्यालय येथे सुद्धा अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सदिच्छा भेट देण्यात आली. याप्रसंगी भूमी अभिलेख अधिकारी सौ. स्मिता गावित यांनी सांगितले की, शासनातर्फे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सर्व खेड्यांचे ड्रोनमार्फत सर्वे करण्यात येत असून १३५ गावे आज पर्यंत पूर्ण झालेले असून फक्त सहा खेडे गाव बाकी आहेत तरी त्यांचे सुद्धा सर्वे लवकरच पूर्ण होईल. सर्व खेड्यातील नागरिकांना सुद्धा पी आर कार्ड म्हणजेच प्रॉपर्टी चे उतारे मिळू शकेल अशी व्यवस्था शासनातर्फे होत आहे . या बाबतीत अमळनेर तालुका अग्रेसर आहे. नागरिकांच्या व ग्राहकांच्या समस्या आपण दोन -तीन दिवसात पूर्ण करण्याच्या प्रयत्न करत असतो अशी माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदस्यांनी सदर कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करुन आभार मानले. अशी माहिती पी आर ओ सौ. मेहराज बोहरी यांनी दिली आहे.
