संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर ; सांस्कृतिक रॅली व ग्रंथदिंडीने होईल संमेलनाची सुरुवात

अमळनेर : येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय पाचव्या अहिरानी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध लोककवी, लेखक विचारवंत प्रसिद्ध नाट्य कलाकार एकपात्री नाटककार, अहिरानी मिमिक्री यासारख्या विविध रसयुक्त कार्यक्रमांमुळे अमळनेर येथे संपन्न होणाऱ्या अहिरानी साहित्य संमेलनाची साहित्यिक, सांस्कृतिक मेजवानी रसिकांना समृद्ध करणारी ठरेल. आयोजकांतर्फे दिनांक ३० व ३१ मार्च रोजी अमळनेर येथे होणाऱ्या अहिरानी साहित्य संमेलनाची भरगच्च कार्यक्रमांची पत्रिका नुकतीच जाहीर करण्यात आली. या संमेलनात सिनेगीतकार, पार्श्वगायक प्रशांत मोरे यांच्या सदाबहार अहिरानी कविता व गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील. तर अहिरानी शब्दकोश, अहिरानी ओवीकोष तसेच अहिराणी गीतांचा चिकित्सक अभ्यास करणाऱ्या डॉ. रमेश सूर्यवंशी यांचे अभ्यासपूर्ण विवेचन यासह नाट्य अभिनेता हर्षल पाटील यांचे नाट्य अभिवाचन होईल. सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट विलास कुमार शिरसाठ यांचे अहिरानी मिमिक्री, विजय पवार तसेच सुप्रसिद्ध एकपात्री नाटककार प्रविण माळी यांचे एकपात्री नाट्य अहिरानी बोलीच्या रसिक प्रेक्षकांचे आकर्षण ठरणार आहे.

सदर संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अमळनेर चे आमदार अनिल पाटील, चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण, धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक पाटील आदी आमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी ३० मार्च सायंकाळी ४ वाजता अहिरानी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक रॅली व ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होऊन सांस्कृतिक रॅली व ग्रंथदिंडीचे आगमन अहिरानी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्यनगरीत होईल व तेथे उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव शामकांत देवरे, आय ए एस अधिकारी राजेश पाटील, सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अहिरानी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून अमळनेर मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले हे असतील. उद्घाटन समारंभ नंतर होणाऱ्या काव्य संमेलनात महाराष्ट्रभरात ज्यांची गीते प्रसिद्ध आहेत असे कवी ज्ञानेश्वर भामरे, डॉ. वाल्मिक अहिरे, दादाभाई पिंपळे, रमेश धनगर यांसह निमंत्रित कवींची काव्यमैफील रंगणार आहे. रात्री ८ वाजेपासून जात्यावरच्या अहिराणी ओव्या, खानदेशी गाणे, अहिराणी नाटिका, कानबाई नृत्य, अहिराणी मिमिक्री, अहिराणी एकपात्री नाट्य, जात्यावरल्या गाणी व इतर कलाप्रकार यांचा समावेश असलेले खान्देशी सांस्कृतिक कार्यक्रम विविध सांस्कृतिक महिला संघ तसेच वैयक्तिक स्वरूपात राज्यभरातून आलेले कलाकार सादर करणार आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ३१ मार्च रोजी अहिराणी माय, आमना खान्देश आणि अभिमान अहिराणीना असे नवकवींचे सत्र होतील तर यानंतर ‘अहिराणी भाषा संस्कृती विचार’ या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादात कोल्हापूर येथील अहिराणी भाषा अभ्यासक डॉ. रविंद्र ठाकूर हे अध्यक्षस्थान भूषवतील तर डॉ. फुला बागुल, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, डॉ. सत्यजित साळवे, डॉ. जगदीश मोरे, डॉ. बाळासाहेब गुंजाळ व डॉ. कृष्णा पोतदार हे आपले विचार मांडतील यानंतर दाभाडी येथील सुप्रसिद्ध कथाकार एस. के. पाटील, प्राचार्य संजीव गिरासे, गोकुळ बागुल, वृषाली खैरनार यांचे अहिराणीतून कथाकथन होईल. दुपारच्या सत्रात अमळनेर येथे यापूर्वी तहसीलदार म्हणून कार्य केलेले व आपल्या अहिराणी गीतांमुळे प्रसिद्ध असणारे सुदाम महाजन यांचा अहिराणी झटका अमळनेरकर रसिकांना अनुभवायला मिळेल. यानंतर महाराष्ट्रभरातून निमंत्रित असलेल्या कवींची काव्य मैफिल रंगेल. यासाठी भाषा संचालनालयाचे अध्यक्ष सुनिल शिरसाठ यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यानंतरच्या सत्रात ‘आयतं पोयतं सख्यानं’ या एकपात्री प्रयोगाने महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले प्रविण माळी आपला एकपात्री प्रयोग सादर करतील.
संमेलनाचा समारोप मान्यवरांच्या व कलाकारांच्या उपस्थितीसह माजी आ. कुणालबाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या समारोप समारंभास माजी शिक्षक आ. डॉ. सुधीर तांबे, माजी आ. शरद पाटील, माजी आमदार बी. एस. पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने सदर संमेलनास उपस्थित रहावे असे अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव प्रभाकर शेळके, स्वागताध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक रणजित शिंदे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे, उपाध्यक्ष डी. ए. पाटील, साहित्यिक समन्वयक डॉ. कुणाल पवार, महिला समन्वयक वसुंधरा लांडगे, सचिव रामेश्वर भदाणे आदींनी आवाहन केले आहे.