सरकारने ई पीक पाहणीची अट रद्द करून सरसकट नुकसान भरपाई चे पंचनामे करावेत

अमळनेर : तालुक्यातील अनेक गावांत दिनांक १५ व १६ तारखेला झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती व शेतपिकांचे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्याने शेती बुडाली असून पूर आल्याने पिके जमीनदोस्त झाली आहेत. यात तालुक्यातील नांद्री, पातोंडा,सोनखेडी, दापोरी, खौशी, खेडी, अमळगाव सह अनेक गावांचा समावेश आहे. पुराच्या पाण्यात जमिनीची माती वाहून गेल्याने शेतातील पिके उघडी पडली असून जमिनी नापीक झाल्या आहेत. जुलै महिन्यात पाऊसच झाला नसल्याने शेतातील पिके मोठ्या प्रमाणावर करपल्याने उत्पन्नात घट झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून सरसकट पंचनामे करून ई पीक पाहणीची अट रद्द करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी अमळनेर तालुका शिवसेना (उबाठा गट) तर्फे अमळनेर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांचेकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर शिवसेना (उबाठा) चे शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार, युवा सेना तालुका प्रमुख राजेंद्र मराठे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार, शहर संघटक मोहन भोई, उपतालुका प्रमुख रविंद्र पाटील, उपतालुका प्रमुख विलास पवार, उपतालुका प्रमुख बाळासाहेब पाटील, उपतालुका प्रमुख भैय्या पाटील, जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, उप जिल्हा प्रमुख देवेंद्र देशमुख, शाखा प्रमुख मुस्ताक बागवान, रवींद्र पाटील कुरे, भास्कर उत्तम पाटील रनाईचे, युवा सेना उपतालुका प्रमुख गोकुळ कोळी, विजय पाटील, विजय हिम्मत पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासकीय यंत्रणेमार्फत आवश्यक ती कार्यवाही करावी अन्यथा शिवसेनेतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.