
अमळनेर : येथील के. ई. एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, अमळनेर तर्फे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवण्यासाठी दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन होते. विचार मंचावर के. ई. एस. संस्थेचे सचिव प्रा. पराग पाटील तसेच इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. वर्षा पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे मनमोहक सादरीकरण करून वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून टाकले. प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करताना “नविन स्थापन झालेल्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी तर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे”, असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविकात प्रा. डॉ. वर्षा पाठक यांनी सांगितले की, के. ई. एस. संस्थेअंतर्गत एम.सी.ए. कोर्ससाठी स्थापन करण्यात आलेले हे नवे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ही केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित राहणार नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जाणीव, नेतृत्व गुण आणि राष्ट्रभावना जोपासण्याकडेही लक्ष देईल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक व प्राध्यापक एकजुटीने प्रयत्नशील राहतील.
या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्पर्धेचे परीक्षण इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांनी केले. एकूण ५० विद्यार्थ्यांनी विविध गटातून स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रताप महाविद्यालयातील बी.सी.ए. व बी.एस.सी. च्या २५० विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून देशभक्ती अनुभवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.सी.ए. विभागातील प्रा. रोहन गायकवाड, प्रा. भाग्यश्री सपकाळे, प्रा. निकीता राऊत, प्रा. नेहा पवार, प्रा. प्रियांका पाटील, प्रा. हिमानी पाटील, प्रा. पल्लवी पाटील, प्रा. माधुरी मोरे, प्रा. अंजली साळी, प्रा. भावेश साळुंखे, प्रा. पनाली पाटील, प्रा. शुभांगी चौधरी आणि प्रा. मानसी साळुंखे तसेच बी.एस.सी. कॉम्पुटर विभागातील प्रा. हर्षदा पाटील व प्रा. उर्मिला पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीसीएची विद्यार्थीनी कु. नम्रता पाटीलने उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रम समारोप प्रसंगी प्रा. धनंजय चौधरी यांनी “महाराष्ट्र गीत” सादर केले. .