धनदाई महाविद्यालयात भारतीय संविधान जागृती कार्यशाळा संपन्न

अमळनेर : येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय “भारतीय संविधान जागृती कार्यशाळा” संपन्न झाली. पावर पॉइंट प्रेझेंटेशन, संविधानावर आधारित गीते, खेळ व मनोरंजनात्मक प्रयोग यांच्या साह्याने सहभागी विद्यार्थ्यांना संविधानाची प्रास्ताविका, त्यातील महत्त्वपूर्ण संकल्पना तसेच संविधान आणि प्रत्यक्ष भारतीय जीवन यांचा संबंध स्पष्ट करण्यात आला या कार्यशाळेस १३५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. “जगभरात अराजकता निर्माण होत असताना संविधान व संविधानाची तत्वे यामुळे भारतीय लोकशाही आजही पाय रोवून उभे असल्याचे” मत त्यांनी आपल्या उद्घाटकीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी भारतीय संविधान हे दलित, शोषित, वंचित कामगार व शेतकरी यासारख्या सर्व घटकांना न्याय देणारे दस्तऐवज असून त्याविषयीची जागृती होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी विचार पिठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील प्रमुख मार्गदर्शक प्रा. अशोक पवार, डॉ. राहुल निकम, डी ए. पाटील, संदीप घोरपडे तसेच कार्यशाळा समन्वयक डॉ. लिलाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेच्या प्रथम सत्रात समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील डॉ. राहुल निकम यांनी संविधानाची प्रास्ताविका, संविधानाचे भारतीय जीवनातील महत्त्व आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या तत्त्वांचे भारतीय लोकशाहीतील महत्त्व स्पष्ट केले. यानंतरच्या सत्रात डॉ. लिलाधर पाटील यांनी सार्वभौम, समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणजे काय? ते खेळ व प्रयोग याद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यानंतरच्या सत्रात मराठी साहित्य परिषदेच्या अमळनेर शाखेचे अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरा व संविधान यांच्यातील संबंध विविध अभंगाच्या सहाय्याने आकर्षक पद्धतीने स्पष्ट केला.

दुपारी जेवणानंतरच्या सत्रात डी. ए. पाटील यांनी “भारतीय संविधानाने महिलांना काय दिले ?” या विषयावरील सत्रात प्रयोग व गीते यांचा वापर करीत संविधानाने महिलांना दिलेले अधिकार, मिळवून दिलेले हक्क व त्यामुळे महिलांच्या जीवनात कशा प्रकारचे सकारात्मक परिवर्तन घडले या बाबी उपस्थितांना स्पष्ट करून सांगितल्या. कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात प्रा. अशोक पवार यांनी भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे आणि आपले दैनंदिन जीवन यातील संबंध स्पष्ट करीत भारतीय अर्थव्यवस्था व बजेट या दृष्टिकोनातून या तत्त्वांचे महत्त्व स्पष्ट केले. अत्यंत क्लिष्ट वाटणाऱ्या अनेक संकल्पना त्यांनी आपल्या पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या सहाय्याने विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.

समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यशाळेमुळे संविधानात असलेल्या संकल्पना सोप्या शब्दात समजून घेता आल्या व त्यांचा आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी असलेला संबंध देखील आम्हाला समजला यामुळे अशा कार्यशाळांचे सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजन व्हावे असे अपेक्षा सहभागींनी बोलून दाखवल्या सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात संविधान सोप्या शब्दात स्पष्ट झाल्याने अशा अनेक कार्यशाळांचे आयोजन विद्यापीठाने करावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या. प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेबद्दल विद्यार्थी मार्गदर्शक व प्राध्यापक यांचे आभार व्यक्त केले तसेच या कार्यशाळा विषयी व्यक्त केलेले अपेक्षा मी माझ्या पातळीवरून विद्यापीठात कळवेल असे आश्वासन देखील त्यांनी दिले कार्यशाळेचा यशस्वीतेसाठी. तसेच विद्यार्थ्यांच्या भावना विद्यापीठात पोहचवू असे आश्वासन दिले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. भगवान भालेराव आणि प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयवंत पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. महादेव तोंडे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल इंगळे, डॉ. रमेश पावरा, डॉ. प्रवीण पवार, प्रा. चेतन चौधरी, प्रा. सागर सैंदाणे, श्री. कैलास अहिरे, श्री. एस. बी. गिरासे, दगडू पाटील, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, विष्णू शेट्ये आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!