विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही : ॲड. कौस्तुभ पाटील

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनागोंदीचा निषेध, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण तसेच पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी NSUI, अमळनेर यांच्या वतीने नुकताच भव्य कॅण्डल मार्च आयोजित करण्यात आला. बळीराजा स्मारक येथून विविध घोषणा देत रॅलीला सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप करण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पालक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणाऱ्या अन्यायाविरोधात आपली एकजूट दाखवून दिली. हा कॅण्डल मार्च केवळ निषेध नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी आणि न्यायाच्या मागणीसाठी दिलेला बुलंद आवाज होता. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही, हा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा हा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील असे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी माजी आमदार बी. एस. पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ॲड. कौस्तुभ पाटील (NSUI जिल्हाध्यक्ष), धनगर दला पाटील, गोकुळ बोरसे, सुलोचना वाघ, दिनेश पवार, मगन भाऊसाहेब पाटील, कैलास पाटील, गिरीश पाटील, रज्जाक शेख, सईद तेली, मनोहर निकम, अशोक पवार, लिलाधर पाटील, प्रताप पाटील, रोहिदास दाजी पाटील, जयेश पाटील, नरेंद्र चव्हाण, सृजन संदानशिव, उमेश संदानशिव, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी दिवंगत झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थितांनी मौन पाळून आदरांजली वाहिली.