अमळनेर : कोरोना मुुुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ता.८ रोजी झाडी व मुडी गावात गरजुंना अन्नदान वाटपसाठी गेलेल्या तरुणांची रिक्षा उलटून दोन तरुण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले.
याबाबत माहिती अशी की, संचारबंदी, लॉकडाऊन काळात बुधवार ता.८ रोजी शहरातील श्रीरामनगर, रामेश्वर काॅलनी परिसरातील काही तरुण सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास झाडी व मुडी गावात अन्नदान वाटपसाठी गेले होते. मुडी येथून परत येत असतांना झाडी गावाजवळ त्यांची पॅजो रिक्षा पलटी झाल्याने सदर घटना घडली. या घटनेत ऋषिकेश उमेश शेटे (वय २०) व विशाल दिनेश पाटकरी (वय १८) हे तरूण ठार झालेे. तर जयेश रमेश पाटील, अक्षय नंदकुमार महाजन व चेतन राजेंद्र चौधरी हे जखमी झाले आहेत. सोबत मोटार सायकलवर येणाऱ्या तरुणांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताळे यांनी जखमींवर औषधोपचार केले. जयेश पाटील हा गंभीर जखमी असून त्याला प्रथमोपचार नंतर पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल फुला, एएसआय रोहिदास जाधव, हेड कॉन्स्टेबल भास्कर चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात भेेट दिली व पंचनामा केला.

