सार्व. बांधकाम विभाग, धुळे चे कार्यकारी अभियंत्यांकडे नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांची पत्राद्वारे मागणी

अमळनेर : मध्यप्रदेश व महाराष्ट्र दोन राज्यांना जोडणारा राज्य मार्ग दगडी दरवाज्याजवळ अतिक्रमित ओट्यांमुळे ७ मीटर झाला असून अतिक्रमण काढून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ प्रमाणे इमारत रेषा व नियंत्रण रेषा ठरवून रस्ता १२ ते १४ मीटर करण्यात यावा, अशी मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
मेहेरगाव धुळे अमळनेर चोपडा खरगोन रस्त्याचे काम धुळे बांधकाम विभागांतर्गत सुरू असून या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ होते. सध्या अब्बासिया मस्जिद जवळ १७.६४ मीटर ते बोरी नदीपर्यंत १३.५० मीटर रस्ता उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त अमळनेरच्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार दगडी बुरुजाच्या उत्तरेकडील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यात अडथळा ठरणारे तेथील विद्युत खांब, विद्युत तारा हटवून भूमिगत केबल टाकण्यासाठी नगरपालिकेने प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यामुळे २ ते ३ मीटर जागा उपलब्ध झाली असली तरीही वाहतुकीची कोंडी होणारच आहे. वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या पाहता त्याव्यतिरिक्त नमूद जागेपेक्षा जास्त जागा उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नगररचना अधिनियम १९६६ च्या किनारवर्ती नियमात एकसूत्रता आणण्यासाठी इमारत रेषा व नियंत्रण रेषा याकरिता घ्यावयाची अंतर लागू करण्यासाठी कलम १५४ अंतर्गत शासन निर्णय ५ ऑगस्ट २०१९ अन्वये रस्त्यालगत झालेल्या ओट्याचे अतिक्रमण काढून रस्ता ७ मीटर ऐवजी १२ ते १४ मीटर रुंदीकरणासह शहरातील सर्व उपरस्त्याना जोडणारे रस्त्याचे फॅनिंग करणे, चौकातील रस्ते रुंदीकरण, सुशोभीकरण, विद्युतीकरण आणि पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी गटारी, फुटपाथ आदी आवश्यक कायमस्वरूपी उपाययोजनासह शासन नियमांची अंमलबाजवणी करण्याची विनंती धुळ्याचे कार्यकारी अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे. पत्राच्या प्रति बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, सचिव महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात आल्या आहेत.