शासन नियमांचे पालन करण्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांचे आवाहन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा आज दि. २० ऑगस्ट २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार आहे. आजपासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता नाही. प्रवासात प्रवाशांनी कोविड १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. असे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत सांगितले.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दि.२३ मार्चपासून मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रीयन विध्यार्थाना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर – सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे. दि.२२ मे पासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली आहे. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेऱ्यातून अंदाजे दीड लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवाशी सेवा एसटीने पुरविली आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा कोविड १९ च्या काळातील शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री परब यांनी केले आहे.