
अमळनेर : शहरातील सराफ बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यात दगडी दरवाजाच्या दुरुस्तीसाठी टाकलेल्या मुरुमामुळे पावसाचे पाणी साचले असून त्याचा व्यापारी व ग्राहकांना त्रास होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील हा अडथळा काढण्यात यावा, अशी मागणी व्यापारी महासंघाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या प्रभावामुळे आधीच सराफ बाजार बंद होता. त्यामुळे व्यापाऱ्यांसह कामगारांच्या जीवनावर परिणाम झाला होता. नंतर सराफ बाजार सुरू करण्यात आला. मात्र दगडी दरवाज्याचा ईशान्य भाग कोसळला आहे. त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली मुरूम दगडी दरवाजात टाकल्याने सराफ बाजाराकडे येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. अति पावसामुळे दरवाजात गुडघाभर पाणी साचून राहिले आहे. दरवाजा दुरुस्तीचे काम कधी होणार याचा नेम नाही. मात्र जाणून बुजून रस्त्यात अडथळा निर्माण करून पादचारी मार्ग देखील बंद करून व्यापाऱ्यांना व नागरिकांना त्रास दिला जात आहे. म्हणून हा मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष जेठमल जैन, मुकुंद विसपुते, मनोज सोनार, रियाज शेख, देवा सोनार, लालचंद जैन, कैलास ढोकळे, रवींद्र सैंदाणे, योगेश पिंगळे, सिद्धेश पिंगळे, शुभम जैन आदींसह सराफ बाजारातील व्यापारी यांच्या सह्या आहेत.