आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना चक्की व शिलाई मशीन देत मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सामाजिक दातृृत्व

अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने धार्मिक कार्यासोबतच सामाजिक जाणिवेचे भान ठेवून महसूल विभागाच्या ‘उभारी’ या उपक्रमात आपले भरीव योगदान दिले. या कार्याची दखल घेत
महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन.पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सहसचिव दिलीप बहिरम यांना जळगाव येथील नियोजन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नुकतेच सन्मानित केले. मंगळ ग्रह सेवा संस्थेने प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आवाहनानुसार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना चार छोट्या चक्क्या व चार शिलाई मशीन देत आपले सामाजिक दातृृत्व सिध्द केले. लाभार्थींमध्ये अमळनेेेर येथील रत्नाबाई सुदाम पाटील, संगिता निंबा पाटील, संगिता वाल्मीक पाटील, छाया दत्तात्रय पाटील यांना शिलाई मशीन देण्यात आली. रेखा संजय पाटील, उषा भागवान पाटील, सुनिता यशवंत पाटील, ललिता अर्जून पाटील यांना पिठाची छोटी गिरणी देण्यात आली. आधार संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाभार्थींची निवड करण्यात सहकार्य केले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, महसूल उपायुक्त डॉ.अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, कैलास कडलग, राजेंद्र कचरे, लक्ष्मीकांत साताळकर, विनय गोसावी, सीमा अहिरे, रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, राजेंद्र वाघ, तुकाराम हुलवळे तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
आयुक्त गमे म्हणाले की, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा कुटुंबांच्या पाठीशी प्रशासन आहे ही भावना रुजवायची आहे. या उपक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यात अतिशय चांगले काम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत वेगवेगळया पध्दतीने मदत करता येते हे जळगाव जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांनी दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही ‘उभारी’ साठी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांचे कार्य व सेवाभावी संस्थांच्या योगदानाचे कौतुक केले.
