परिसरातील हजारो नागरिकांना पोस्टाद्वारे आर्थिक व्यवहार व पोस्टाची सोय उपलब्ध होणार

अमळनेर : तालुक्यातील खवशी हे दोन हजारांहून अधिक लोकवस्तीचे गाव असून गावा लगत सात ते आठ गावे दळणवळण सेवेपासून वंचित आहेत. यामुळे दळणवळणासाठी खौशी गावात पोस्ट ऑफिस शाखा तातडीने मंजूर करण्यात यावी अशी शिफारस करणारे पत्र खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांनी मुख्य पोस्ट मास्तर, महाराष्ट्र परिमंडळ, मुंबई यांना नुकतेच पाठविले आहे.
पत्रात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यातील खवशी हे दोन हजारांहून अधिक लोकवस्तीचे गाव आहे. हे गाव बँका व पोस्ट ऑफिस शाखेपासून वंचित आहे. खवशी परिसरात नांद्री, खेडी सिम, पिंपळी, खेडी प्र.ज. अशा सात ते आठ गावांचा भाग दळणवळणाच्या दृष्टीने जोडला गेलेला आहे. असे असूनही गावात बँक व पोस्ट ऑफिस शाखेची सुविधा उपलब्ध झालेली नाही. यामुळे येथे तातडीने पोस्ट ऑफिस ची सुविधा उपलब्ध करून दिल्यास परिसरातील हजारो नागरिकांची पोस्टाद्वारे आर्थिक व्यवहार व पोस्टाची सोय उपलब्ध होणार आहे. यामुळे दळणवळणासाठी खवशी गावात पोस्ट ऑफिस शाखा तातडीने मंजूर करण्यात यावी अशी शिफारस पत्राद्वारे करण्यात आली आहे. या गावात ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, दूध उत्पादक संस्था कार्यरत असून आर्थिक व्यवहारासाठी पातोंडा अथवा तालुक्याचे ठिकाणी जावे लागते. गावकऱ्यांना काम सोडून बाहेरगावी जावे लागत असल्याने यात त्यांचा दिवस वाया घालवावा लागतो. या बाबींचा विचार करुन सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील व ग्रामस्थांनी खासदार उन्मेश पाटील यांना विनंती केली होती. खासदार पाटील यांनी दखल घेत संबंधित यंत्रणेला पत्र पाठविल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
