१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करणे अनिवार्य

जळगाव : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ नुसार, १५ ऑगस्ट, २०२१ रोजी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र सद्य:स्थितीत कोविड-१९ विषाणूच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपायोजना राबविण्याकामी शासन व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी आवश्यक ते निर्बंध लागू करण्यात आलेले आहे.

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक ११ ऑगस्ट, २०२१ रोजीचे ‘ब्रेक द चेन’ सुधारीत मार्गदर्शक सूचना आदेशान्वये कोविड प्रादुर्भावास प्रतिबंध करणेच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेता, जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी वैधनिक सभेचे/ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत नागरिकांची अनावश्यकरित्या गर्दी होण्याची शक्यता आहे. याकरीता अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्याअनुषंगाने ग्रामसभा या ऑफलाईन घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र ऑनलाईन व्यवस्था देखील करण्यात यावी. ऑफलाईन पध्दतीने २०० पर्यंत ग्रामस्थ सहभागी होऊ शकतात. मात्र त्यापुढील ग्रामस्थ ऑनलाईन पध्दतीने सहभागी होतील. या ग्रामसभांमध्ये पोकरा (POCRA) (लागू असलेल्या गावांसाठी), जातीवाचक गावांची व रस्त्यांची नावे बदलणे आदि शासनाकडील प्राधान्याचे विषय चर्चेत घ्यावेत.

ग्रामसभेमध्ये उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सॅनिटाईजरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे व शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करणे अनिवार्य राहील. तसेच ग्रामसभेच्या प्रवेशाच्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांचे थर्मल गनच्या सहाय्याने तापमान मोजणे व सदर ठिकाणी निर्जतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकाची राहील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!