हवामान विभागाचा या आठवड्यातला अंदाजही खरा ठरला

अमळनेर : पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटूनही खानदेश कोरडाच होता. संपूर्ण खानदेशात वार्षिक सरासरीच्या २५% पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असल्याने पिके हाती येण्याची शक्यता मावळली होती. हवामान विभागाचे यापूर्वीचे अंदाज ही फेल ठरत होते. या आठवड्यात दि.१६ ते २२ आॉगष्ट कालावधीतील अंदाज खरा ठरला. अखेर आज जिल्ह्यात सर्वत्र वरुण राजा चांगलाच बरसल्याने शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. या हंगामातील पिके वाया जाण्याची चिन्हे असतांनाच बरसलेल्या पाऊसामुळे पिकांना आधार मिळाला आहे. झालेल्या या पावसामुळे जलपातळीत काही प्रमाणात वाढ होणार आहे.
संपूर्ण खानदेशात गावोगावी गुरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे पुढे काय होणार ? या भितीने शेतकरी राजा खूपच खचला होता. असंख्य शेतकरी बांधवांनी आपली व्यथा तालुका व जिल्हा स्तरावर आमदारांसह शासकीय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मांडली आहे. संबंधितांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचेकडे दुष्काळामुळे पिडीत झालेल्या शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडल्या. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असून यात खानदेशचा प्राधान्याने विचार होऊन न्याय देण्याचा प्रयत्न होईल’, अशी ग्वाही शेतकरी बांधवाना मिळाली आहे. तो विचार व न्याय होवो न होवो पण.. वरुण राजाने योग्य तो न्याय दिला आहे.
