
जळगाव : महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. आरएलपी-१०२१/प्र.क्र.२४७/विशा-१ब, दि.२७ ऑक्टोबर, २०२१ अन्वये दिपावली उत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सुचना निर्गमीत केलेल्या आहेत. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्वधर्मीय सण/ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने, जळगाव जिल्ह्यात कोव्हिड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या असून या सुचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले आहे.
दीपावली उत्सवा दरम्यान कपडे/फटाके/दागदागिने व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यावर गर्दी होत असते. तथापि, नागरीकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरीक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.
दीपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणांवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढुन जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दीपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरीकांना फटाकांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे ही बाब विचारात घेऊन नागरीकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा.
सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश क्र. कोरोना २०२१/ सी.आर.३६६/आरोग्य-५, दि.२४ सप्टेंबर २०२१ अन्वये ‘‘ब्रेक दि चेन’’ अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्याचे निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करतांना सदर मार्गदर्शक सुचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा- रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.
मा. सर्वोच्च न्यायालय रिट पिटीशन (सिव्हील अपिल) क्र. ७२८/२०१५ (निर्णय दि.२३.१०.२०१८) तसेच सिव्हील अपिल क्र. २८६५-२८६७/२०२१द (निर्णय दि.२३.७.२०२१) मधील आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. कोविड-१९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होणाच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करणे आवश्यक राहील. या सुचनांचे पालन न केल्यास सबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ व भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव अभिजीत राऊत यांनी एका प्रसिद्धी परिपत्रकान्वये कळविले आहे.