विविध क्षेत्रात कामगिरी करणारे चार जणांना ‘स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार’ ने मिळाली कामाची पावती

अमळनेर : येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल तर्फे शाळेच्या आवारात स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी महाराष्ट्र शासनाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव चंद गोयल, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, बजरंग अग्रवाल, संचालक सीए निरज अग्रवाल, प्रा.डी.डी.पाटील, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात कामगिरी करणारे चार जणांना महाराष्ट्र शासनाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव चंद गोयल व जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते ‘स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यात, सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल जयकर पवार, शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणारे येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल चे उपक्रमशील शिक्षक तथा दै. “सकाळ”चे तालुका पत्रकार उमेश प्रतापराव काटे, कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात काम करणारे माजी उपनगराध्यक्ष रामदास शेलकर यासह अमळनेर महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांना शाल, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सहावे “सृजन- भारत निर्माण” वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात सर्वप्रथम शाळेत विविध उपक्रमात नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटपही करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. यावेळी असंख्य पालक, अमळनेर महिला मंचच्या सदस्या, पातोंडा विकास मंचचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. नोबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य हेमंतकुमार देवरे, उपप्राचार्य व्ही.पी.अमृतकर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.