पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे असलेली विक्रमी ५२५०० पोस्टकार्ड रवाना

निम्न तापी प्रकल्पाबाबत खोटी आश्वासने देत सर्वपक्षीय मंत्री व नेत्यांनी केली जनतेची फसवणूक : सुभाष चौधरी

आजी माजी लोकप्रतिनिधींच्या घोषणांचाही घेतला समाचार

अमळनेर : येथील पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनी काल दि.९ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणुकीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे असलेली विक्रमी ५२५०० पोस्टकार्ड अमळनेर येथील पोस्ट मास्तर रघुनाथ साळुंखे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. ‘धरणाचे आंदोलन आता जनतेच्या हातात देऊ व परिणामास शासन जबाबदार राहील ‘ असा जाहीर इशारा समितीच्या वक्त्यांनी दिला. रणरणत्या उन्हामध्ये बळीराजा स्मारक येथे जमलेल्या हजारो आंदोलकांनी बळीराजाला पुष्पहार अर्पण करून क्रांतीची मशाल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पेटविण्यात आली. जनतेने लिहिलेली हजारो पत्र सजविलेल्या बैलगाडीत ठेवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. बैलगाडीपुढे जनआंदोलन समितीचे शेकडो कार्यकर्ते पांढरी गांधी टोपी घालून ‘पाडळसे धरण झालेच पाहिजे’ अशा घोषणा देत होते. त्यापुढे मोठ्या संख्येने रॉयल उर्दू स्कूलचे, अँड ललिता पाटील इंग्लिश स्कूल, पीबीए इंग्लिश मिडीयम स्कूल चे विद्यार्थी पिवळ्या टोप्या घालून सहभागी झाले होते. सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी लेझिम खेळत मिरवणुकीला लक्षवेधी शोभा आणली होती. महिला कार्यकर्त्याही जोशात घोषणा देत होत्या.

सर्वात पुढे तिरंगा ध्वज घेवून माझी सैनिक संघटनेचे फौजी जीपगाडीवर जय जवान,जय किसानचा नारा देत होते. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी ‘धरण झालेच पाहिजे’ या मागणीच्या टोप्या घालून घोषणाबाजी करत विश्राम गृह, विजय मारोती, बस स्टँड, पाचपावली देवी, लालबाग शॉपिंग मार्गे, अग्रसेन महाराज चौकात आले. पोस्ट ऑफिस समोरील मैदानात यावेळी झालेल्या सभेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ५२५०० पोस्ट कार्ड पोस्ट मास्तर रघुनाथ साळुंखे यांना सुपूर्द केले. पोस्ट मास्तर साळुंखे यांनी ५२ हजार ५०० पोस्टकार्ड मिळाल्याचे सांगत तातडीने स्टॅम्पिंग करून मंत्रालयात पाठविण्यात येतील असे जाहीर केले.

यावेळी समितीचे प्रमुख कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी १९९७ पासून पाडळसे धरणाचे कासवगतीने चालणाऱ्या कामास, वाढणाऱ्या हजारो कोटींच्या किंमतीस राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरला असल्याचा घणाघाती आरोप केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या समितीच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका असा इशाराही दिला. महेंद्र बोरसे यांनी पुनर्वसनाबाबतचे प्रश्न मांडत शासन कायद्याच्या आड विस्थापितांना न्याय देण्यात दिरंगाई करीत असल्याचे सांगितले. धुळे चे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी हजारो पत्रांची नोंद शासनाने न घेतल्यास आता समितीने आक्रमकपणे रस्त्यावर उतरावे असे आवाहन केले. तर माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी हा एकमेव माणूस सातत्याने धरणासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह लढत असल्याने जनतेनेही आता निष्क्रिय नेत्यांना जागा दाखवावी असे जाहीर आवाहन केले. पाडळसे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी तालुक्यातील जनतेची सर्वपक्षीय मंत्री व नेत्यांनी निम्न तापी प्रकल्पाबाबत खोटी आश्वासन देवून फसवणूक केल्याची जाहीर टीका करत आजी माजी लोकप्रतिनिधींच्या घोषणांचा समाचार घेतला. हजारो पत्रांमधील मागणीनुसार, धरणाबाबतच्या सर्व सुधारित प्रशासकीय मान्यता देवून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत निर्णय न झाल्यास पत्रात लिहिल्यानुसार येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल असे जाहीर केले. सभेचे सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील यांनी तर आभार महेश पाटील व सुनिल पाटील यांनी मानले. आर.बी.पाटील यांनी मिरवणुकीत डफावर गीते सादर केली.

आजी माजी मंत्री व नेते यांनी फिरवली पाठ : पाडळसे प्रकल्पासंदर्भात नेहमी घोषणांचा पाऊस पाडणारे आजी माजी मंत्री व नेते यांनी मात्र पत्रांच्या या भव्य मिरवणुकीत पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.

मंचावर समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, चंद्रकांत काटे, समितीचे हेमंत भांडारकर, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, महेश पाटील, सुनिल पाटील, प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, रामराव पवार, गोकुळ पाटील, महेंद्र बोरसे, आर.बी.पाटील, अजयसिंग पाटील, गोकुळ बागुल, प्रवीण संदानशिव, प्रताप साळी, सुनिल भोई, सुपडू बैसाणे, अँड तिलोत्तमा पाटील, प्रतिभा पाटील, राजश्री पाटील, पुरुषोत्तम शेटे, बापू चौधरी, सुनिल भोई, रियाज मौलाना, रजाक शेख, प्रसाद चौधरी, नारायण बडगुजर, सुरेश पाटील, एस.आर.पाटील, डी.के.पाटील, सुशील भोईटे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.अनिल शिंदे, नगरसेवक मनोज पाटील, शेतकरी नेते सुभाष पाटील, आधार फाऊंडेशन चे अशोक पाटील, अरुण देशमुख, विक्रांत पाटील, मनोहरनाना पाटील, धनगर पाटील, आम आदमी चे शिवाजी पाटील, प्रा.गणेश पवार, भाजप चे श्याम अहिरे, महेंद्र महाजन, रमेश धनगर, विक्रांत पाटील, राष्ट्रवादीचे अनिल शिसोदे, भूषण भदाणे, सुनिल शिंपी, मंगळ ग्रह मंदिराचे अध्यक्ष डिगंबर महाले, धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे कल्याण पाटील, सूरज परदेशी, बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रथमेश पवार, कुंदन खैरनार, मकसुद बोहरी, प्रितपालसिंग बग्गा, रोटरी चे कीर्ती कोठारी, पांडुरंग महाजन, प्रा.श्याम पवार, भागवत सुर्यवंशी, राजाराम बडगुजर, सौ.सुरेखा पवार, प्रदीप अग्रवाल, प्रविण जैन, प्रविण पाटील, विवेक पाटील, भाऊसाहेब देशमुख, नावेद शेख, टपरी धारक संघटनेचे चंद्रकांत साळी, खान्देश रक्षक संघटनेचे फौजी धनराज पाटील,विजयसिंह पाटील, विवेक पाटील आदींसह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!