महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा भडगाव येथे रास्ता रोको

कापसाला प्रतिक्विंटल तेरा हजार रुपये भाव व दरवर्षी पंधरा टक्के वाढ मिळण्याची प्रमुख मागणी


भडगाव : महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भडगाव येथे पाचोरा चौफुलीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनिल देवरे यांच्या नेतृत्वाखाली आज ७ एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भडगाव तालुकाध्यक्ष अभिमान राघो हाटकर व तालुका कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी, शेतकरी यांच्या पाठबळावर रास्ता रोको आंदोलन यशस्वी झाले. रास्ता रोको आंदोलनावेळी शेतकऱ्यांचे हाती संघटनेचे झेंडे व मागण्यांचे फलक होते. कापसाला प्रतिक्विंटल तेरा हजार रुपये भाव मिळावा व दरवर्षी पंधरा टक्के वाढ व्हावी, महाराष्ट्रातील पाटचाऱ्या व रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत, वीजेचे प्रश्न आदी विविध मागण्या करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लोकप्रतिनिधींनो.. आता तरी स्वतःला सुधारा व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, मुंबई ला गोट्या खेळायला जाऊ नका..!

संघटनेचे अध्यक्ष सुनिल देवरे यांनी शेतकरी व कष्टकरी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विनंती करत चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, आम्ही अन्न, वस्त्र, निवारा शी निगडीत जनता व शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांवर फोकस करणार आहोत. शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करून आमदार, खासदार झालेले लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने शासनाने चुकीचे धोरण राबवित कापसाचे भाव पाडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. आपल्या
लोकप्रतिनिधींनी मिळालेल्या संधीचे सोने करावे असे सूचक विधानही केले. विधिमंडळात जाऊन आमदार, खासदार हे मतदारसंघाचे विविध प्रश्न मांडण्याचे काम करतात. परंतु.. ते असं न करता शेतकऱ्यांच्या सर्वात महत्त्वाच्या गंभीर प्रश्नावर कापसाला तेरा हजार रूपये हमी असूनही एक शब्दसुध्दा विधिमंडळात काढत नाहीत. अशा लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी बांधव त्यांना त्यांची जागा दाखवतील. आता तरी लोकप्रतिनिधींनी स्वतःला सुधारुन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे, मुंबई ला गोट्या खेळायला जाऊ नये..! असेही मत त्यांनी आंदोलनावेळी व्यक्त केले. भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन राघो हाटकर यांनी यासंदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा याकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. त्यामुळे पुढील काळात आम्ही
यापेक्षाही मोठे आंदोलन उभे करु असे सांगितले. यावेळी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष देविदास पाटील यांनी वडली घटना घडते यासारखे दुर्दैव दुसरे कुठले नसल्याचे सांगितले. भडगाव तालुका उपाध्यक्ष शांताराम आचारी, संपर्कप्रमुख भगवान चौधरी, माहिती प्रमुख विलास वासुदेव देशमुख, खजिनदार मनोज परदेशी यांचेसह अन्य तालुक्यातील शाखांचे पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाने आपली चोख कामगिरी बजावली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!