युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे एकाच वेळी १०० ठिकाणी १०० व्याख्यानांद्वारे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शिवशक वर्षानिमित्त वर्षभर आयोजित केलेल्या कार्यक्रमापैकी दिनांक २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती तथा सामाजिक न्यायदिन साजरा करण्यात आला. एकाच वेळी १०० ठिकाणी १०० व्याख्यानांद्वारे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. येथील धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात सायंकाळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी सोबत विचार मंचावर राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाचे मार्गदर्शक तथा युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे, डॉ. हेमंत कदम उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. विलास पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
समारोपीय मनोगतात पोलीस निरीक्षक विजय शिंदे म्हणाले की, बीज पेरले म्हणजे लगेच फळ मिळत नसते. बिजारोपणात ताकद असावी लागते. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. अशोक पवार यांनी ते एकाच वेळी १०० व्याख्याने घेऊन सिध्द केले आहे. मी जे काम करतो तेदेखील मराठा सेवा संघाचेच आहे. जे समाजासाठी योग्य त्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करु.
मार्गदर्शक प्रा. डॉ. लिलाधर पाटील म्हणाले की, कृतीयुक्त ध्येयवाद काय असतो ? यासाठी लोकप्रतिनिधींना शाहू महाराज सांगावेत. लोकराजाने प्रत्यक्ष कृतीतून स्वत:च्या जीवाशी खेळत राधानगरी धरण पूर्ण केले. कृषी क्रांती केली, पत्रावळी उचलली. आजच्या काळात पेन, पुस्तक, संगणक हेच आजचे शस्त्र असल्याचे सांगितले.
प्रा. अशोक पवार यांनी सांगितले की, हिंदू मुस्लिम संघर्ष एक चिंतन करण्याची गरज आहे. सामाजिक एकोपा राखण्यासाठी त्यावर पोलीस प्रशासन सोबत चर्चा व्हावी अशी विनंतीही केली. एकावेळी १०० व्याख्यान या कार्यक्रमाचे श्रेय सर्व टीमचे असल्याचे स्पष्ट केले. यानंतर मराठा सेवा संघात नव्याने प्रवेश केलेल्या सदस्यांचे प्रमुख पाहुणे विजय शिंदे यांनी पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रेमराज पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.