
अमळनेर : येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पार पडले. या संमेलनावर आधारित विशेष कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर मंथन झाले. खान्देशी बोलीभाषा व खान्देशचे साहित्यिक वैभव या विषयांवर साहित्य रसिकांना मेजवानी मिळाली. विशेष म्हणजे तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान या संवेदनशिल विषयांसह संमेलनादरम्यान तीन दिवस कार्यक्रम पार पडले. या सर्व कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा सह्याद्री वाहिनीवर विशेष कार्यक्रमात घेण्यात आला आहे. कार्यक्रमाची निर्मिती वैष्णो व्हिजनचे संचालक तथा निर्माता, दिग्दर्शक जयु भाटकर यांनी केली आहे. सर्वांनी कार्यक्रम बघावा, असे आवाहन मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी व कार्यकारी मंडळाने केले आहे.