
अमळनेर : जिल्ह्यात सक्षम बालविवाह निर्मुलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग जळगाव, युनिसेफ, एस.बी.सी.३ व साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे. बालविवाह निर्मूलनासाठी २०२४ या वर्षात जिल्हयातील (६ वी ते १० वी) १२५ निवडक शाळांमध्ये बालविवाह निर्मुलनासाठी विद्यार्थी सक्षमीकरण आणि पालक जागरुकता सत्र घेण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये बालविवाह निर्मूलन पालक सत्राला चांगला प्रतिसाद मिळत आहे..
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव ता.अमळनेर या शाळेमध्ये विद्यार्थी सक्षमीकरण आणि पालक जागरूकता सत्र घेणेसाठी महिला व बालविकास विभाग यांच्या सहकार्याने व यनुसेफ एस.बी.सी.-३ याच्या आर्थिक सहाय्याने जिल्ह्यातील स्थानिक भागीदार संस्थेच्या प्रशिक्षित स्वयंसेवकांमार्फत सत्र घेण्यात आले. सर्वप्रथम प्रशिक्षक सौ प्रतिभा गजरे, लिना जाधव यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक वृंद यांनी केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर. महाजन यांनी केले.
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने व साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या सहयोगाने प्रशिक्षक सौ. प्रतिभा गजरे, लिना जाधव यांनी उत्तम सादरीकरण करून आपल्या कृतीयुक्त प्रबोधनातून बालविवाह निर्मूलनाची गरज पटवून दिली. आजही बालविवाह ही समाजातील खूप मोठी समस्या असून एकीकडे मुली शिक्षित होण्याचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे कमी वयात लग्न करण्याचे प्रमाण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये आहे. हे बदलायचं असेल तर पालकांनीच जागृत होऊन मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे होईपर्यंत लग्न लावून न देण्याचा निर्धार करावा. अशा घटना कुठे घडत असतील तर तातडीने त्यांची माहिती शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आय.आर.महाजन , एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरुण सोनटक्के यांनी प्रयत्न केले.