उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा संवाद कार्यक्रमात साधला विद्यार्थ्यांशी संवाद

अमळनेर : मुलींना आता जे शिकायचे ते शिका स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षण घ्या परिस्थितीचा आणि पैशाचा विचार मुळीच करू नका कारण तुमच्या इच्छापूर्तीची तयारी राज्य सरकारने केली आहे. मुलांना देखील योजनांच्या माध्यमातून त्यांच्या पायावर उभे करण्याच्या प्रयत्न असल्याची भावना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रताप महाविद्यालयातील राणे सभागृहात आयोजित युवा संवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त काल दिनांक १२ रोजी अमळनेर येथे आले होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. प्रताप महाविद्यालयात त्यांचे आगमन झाल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनी राजनंदिनी यादव हिने स्वागत गीत सादर केले. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रांती केली म्हणूनच मी आमदार झाल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेले पाच दिवस जनसन्मान यात्रेनिमित्त आम्ही फिरतोय. आम्ही जे निर्णय घेतले ते सांगण्यासाठी आम्ही आलो. अनेक वर्षाची परंपरा आहे की, आई वडील मुलांच्या शिक्षणासाठी झुकते माप देतात पण.. मुलीही मागे नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आता स्पर्धेचे युग आहे. मुलांना त्यांच्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षण दिले पाहिजे. मुलींच्या बाबतीत विचार केला तर ज्यांची ऐपत आहे त्यांची मुले पाहिजे ते शिक्षण घेऊ शकतात पण सामान्य लोकांचे काय ? यासाठी आम्ही ३००० कोटींची तरतूद करुन मुलींना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. खुशी भदाणे या विद्यार्थिनींने रांगोळीतून अजित पवार यांचे दर्शन घडविले. स्थानिक थोर व्यक्तींचे स्मरण व अभिवादन केले. धार्मिक स्थळांचा उल्लेख करत युवा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आई – वडिलांना अभिमान वाटेल असे शिक्षण मिळेल. मुलांना प्रशिक्षणा बरोबर विविध घटकातील मुलांसाठी योजना काढतोय. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले. मंचावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रा. अमोल मिटकरी, खा. शि मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, कार्याध्यक्ष संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल संचालक हरी भिका वाणी, योगेश मुंदडा, डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, प्राचार्य अरुण जैन, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक विजय तुंटे यांनी केले.