जातीय सलोखा व शांततेसाठी अमळनेेर महिला मंच व पोलीस स्टेशन चा उपक्रम

अमळनेर : येथील अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सर्व धर्म परिषद २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर शहरात, धर्माधर्मात सलोखा, शांतता व सौदार्हपूर्ण वातावरण असावे यासाठी या सर्वधर्म परिषदेचे आयोजन केले आहे. सर्व महामानव सर्व धर्माचा आदर करतात, आपण का नाही ?आपण कोणत्याही धर्माचे असा, प्रथम माणूस बना. शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. मानवता हाच खरा धर्म आहे हाच संदेश या सर्व धर्म परिषदेतून देण्यात येणार आहे. या परिषदेत वक्ते म्हणून जयसिंग वाघ, साध्वीजी प्रमोदिता श्रीजी म. सा., भिख्खू नागसेन खान्देश, मकसूदभाई बोहरा, भाईसाब घनश्यामदास तोलाणी जग्याशी, ग्रेव्ही दरबारी, संत बाबा धीरजसिंघजी, मुफ्ती हरुन नदवी, रेव्हरंड विशाल वळवी आणि वेदमुर्ती भागवतकार अमोल शुक्ल हे विविध धर्माचे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेचे समालोचक प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. सुशील अत्रे हे असून सदर परिषद दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल अमळनेर येथे होणार आहे. सदर परिषदेत सर्व महिला व पुरुष बांधवाना निमंत्रित करण्यात आले असून आपल्या शहरात जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी जास्तीतजास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महिला मंच ट्रस्ट अध्यक्ष डॉ. अपर्णा मुठे, सचिव सरोज भांडारकर, कोषाध्यक्ष सौ. कांचन शहा, प्रकल्प प्रमुख वसुंधरा लांडगे व कार्यकारिणी सदस्य अमळनेर महिला मंच ट्रस्ट आणि अमळनेर पोलीस स्टेशन यांनी केले आहे.