
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात भूगोल विभागातर्फे पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भूगोल विभागात विजयसिंग पवार यांचे ‘भारतीय अंतराळ मोहिम आणि प्रगती’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन होते. डॉ. महेंद्र महाजन यांनी प्रस्तावना व वक्त्यांचा परिचय करून दिला.
दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रयान – ३ मधील विक्रम लँडर चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरला. त्यामुळे चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील चौथा व चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल खुणा उमटविणारा जगातील पहिला देश ठरला. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी २३ ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिवसाचे औचित्य साधून ‘अवकाशावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ.कैलास निळे यांनी विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व विशद करुन भूगोल विषयाच्या माध्यमातून करिअरच्या विविध क्षेत्रात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण गावित यांनी केले तर डॉ. प्रमोद चौधरी यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अमित शिरसाठ, प्रा. भूषण पवार, प्रा. चंद्रकांत जाधव, प्रा.चंद्रशेखर वाढे, प्रा. प्रितम पावरा, प्रविण धनगर, महेश राजपूत आदींचे विशेष सहकार्य मिळाले.