शिर्डी येथील व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनातला सूर; भरगच्च उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारांचे झाले वितरण

अमळनेर : समाज माध्यमे ही लोकशाहीसाठी चांगली आहेत. यामुळे अभिव्यक्तीचा अधिकार मिळाला आहे. मात्र यामध्ये बातमी देताना सामाजिक भान बाळगले पाहिजे. दृकश्राव्य, मुद्रित माध्यमांचे महत्त्व आजही कायम आहे असा सूर व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी येथील दुसऱ्या राज्य अधिवेशनात निघाला. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे शनिवार दि.३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी दोन दिवशीय अधिवेशन शिर्डी येथील साई पालखी निवारा शेड येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये राज्यभरातील असंख्य पत्रकार सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त संपादक मंडळींची पत्रकार प्रसन्न जोशी व आमदार सत्यजित तांबे यांनी मुलाखत घेतली. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, लेखक अशोक वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, तसेच सरिता कौशिक सहभागी झाल्या.

मुलाखतीतून मनोगत व्यक्त करताना अनेक विषयांवर उहापोह करण्यात आला. मीडिया विकली गेली आहे हा नॅरेटिव्ह धोकादायक आहे. समाजाचे विषय हाताळणारे पत्रकार आज महत्त्वाचे आहेत. त्यांच्या मनात कोणतीही भीती निर्माण होणार नाही असं वातावरण तयार होणे गरजेचे आहे. आज पत्रकारांना किती पगार मिळतो ? त्याला किती पगार द्यावा ? याचं बंधन संस्था मालकांना नाही. पत्रकारांची प्रगती कशी होईल, विशेष कौशल्य प्राप्तीसाठी विशेष प्रयत्न व्हावेत. याबाबतीत आजची परिस्थिती चांगली नाही ती बदलणे गरजेचे आहे. आज पत्रकार दिवस रात्र राबत असतात, त्यांना मिळतं काय ? हा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याचा उदरनिर्वाह चालेल, त्याला कुणाकडे जात कोणाकडे हात पसरावे लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. पत्रकारांनी सत्तेला प्रश्न विचारायचे असतात. क्रेडिटिबिलिटी ठेवायला पाहिजे, सडेतोड बोलणारे लोक समाजाला आवडतात. आज सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असताना पत्रकारांवर सामाजिक राजकीय दबाव असल्याचे पाहायला मिळते. त्यांना ट्रोल केल जातं, असं होणं चुकीचं आहे. आपण जे काम करतोय ते बरोबर आहे ना हे तपासलं पाहिजे. पत्रकारांनी आपल्या मनाला विचारलं पाहिजे. चूक असेल तर माफी मागितली तरी काही हरकत नाही. सत्ता राबवीत असताना समानतेचे तत्व वापरायला हवं. जेव्हा सरकारी संस्थांचा सिलेक्टिव पद्धतीने वापर केला जातो तेव्हा लोकशाही धोक्यात असल्याची भावना निर्माण होते. अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार प्रमोद कांबळे, भाजपा युवा मोर्चाचे विक्रम पाचपुते, सहसचिव महसूल संजय इंगळे, उद्योजक राणा सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डिगंबर महाले, अहमदनगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने व पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.