
अमळनेर : येथील इंदिरा भवन येथे चेतना मेलोडी आर्केस्ट्रा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडला. यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खरं तर कार्यक्रम पाहताना आपणच दृष्टीहीन आहोत याचा प्रत्यय आला. आपल्याकडे डोळे असूनही आपण मागे असल्याची जाणीव झाली. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंध, अपंग, मुके, बहिरे यांना कोणी कमी लेखू नये, वाईट वागणूक मिळू नये म्हणून ‘दिव्यांग’ हा शब्द वापरण्यात येत आहे. सामाजिक काम करताना आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्देशाने अमळनेर मध्ये दिव्यांग बांधवांच्या कार्यक्रमाला उद्योजकांनी भरभरून प्रेम दिले. या मिळालेल्या सहाय्यातून दिव्यांग बांधवांच्या गरजा भागविण्यात येतात. अमळनेर ही संतांची भूमी असली तरी अमळनेर करांचे काहीतरी देणे आहे या उद्दिष्टाने अमळनेर मध्ये आर्केस्ट्रा होत असल्याचे संचालक तात्यासाहेब पानपाटील यांनी सांगितले.
आर्केस्ट्रा कार्यक्रमाला अमळनेर करांनी आर्थिक व प्रशासकीय सहकार्य केले. जळगाव जनता सहकारी बँक, अमळनेर नगरपरिषद, तहसील कार्यालय, अमळनेर पोलीस कर्मचारी, मोहिनी बँड, माजी नगरसेवक दादा पवार, पत्रकार बांधव यांचे सहकार्य लाभले. इंदिरा भवन चा कारभार नुकताच राजेंद्र वाणी यांनी सांभाळल्याने त्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. दिव्यांग बांधवांनी प्रतिक्रिया देताना देवाने डोळे नाही दिले तरी प्रेक्षकांचे मन भरुन जाईल असे गुण आमच्यात भरल्याचे सांगितले. साहजिकच दिव्यांग बांधवांना दृष्टी आहे जी आपल्यात नाही असे वाटते. गाणी सादर करताना कार्यक्रमात गाण्याचा क्रम ठरत असतो. संचालक तात्या पानपाटील यांनी सत्यम शिवम सुंदरम गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर ए रेशमी जुल्फे.., तुम्हे देख कर जी रहे है सभी.. अशी अनेक गाणी कलाकारांनी सादर केली. कार्यक्रमाचे शेवटी ये मेरे वतन के लोगो.. जरा आंख मे भरलो पाणी, जो शहीद हुए है उनकी.. जरा याद करो कुर्बानी.. या गीताने सर्वांना स्तब्ध केले. यावेळी अमळनेर उबाठा गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. ललिता पाटील भावनिक झाल्या. त्यांनी मेलोडी आर्केस्ट्रा ग्रुपला शुभेच्छा दिल्या. सोबतच अमळनेरकर जनतेने भरभरुन शुभेच्छा दिल्या.