अमळनेर तालुक्यातील अपूर्ण पोलीस बळामुळे सुरक्षितता धोक्यात

अमळनेर : तालुक्यात सध्या सर्वत्र वाढलेले अवैध धंदे व त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण असून एक दिवसा आड वाहन चोरी, घरफोडी व सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडतांना दिसत आहेत. संता सह क्रांतिकारकांची नगरी असलेल्या शहराची जातीय दंगलीमुळे प्रतिमा खराब होत आहे. याशिवाय महिला असुरक्षितता या विषयावर जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील व युवक तालुकाध्यक्ष परेश शिंदे, अक्षय चव्हाण यांच्यासह काही सहकाऱ्यांनी अमळनेेर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक विकास देवरे यांची भेट घेतली. तालुक्यात वाढत असलेल्या घरफोडी, वाहनचोरी संदर्भात तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला.
पोलीस निरीक्षक यांचेशी झालेल्या चर्चेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत अर्थात १ जानेवारी २०२४ पासून ते आज पर्यंत नऊ महिन्यात चोरी – ५६, घरफोडी – १५, जातीय दंगली -४, महिला बेपत्ता होणे – ५५ याप्रमाणे दाखल झालेल्या घटनांची माहिती मिळाली. याशिवाय मारामाऱ्या व जीवे मारण्याच्या धमकी सारखे अनेक गुन्हे दाखल झालेले नाही. मागील आठवड्यात पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या एकट्या ढेकू रोड परिसरातून एकाच दिवशी पाच मोटरसायकली चोरीस गेल्या आहेत. विशेष बाब म्हणजे सदर रस्ता हा पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या वर्दळीचा आहे. शहरात ठिकठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. या विरोधात स्थानिक लोकप्रतिनीधी एकचकार शब्द सुध्दा बोलायला तयार नाहीत. नागरिक भयभीत झाले असल्याने यावर पोलीस प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करुन नागरिकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पोलीस स्टेशनला अपूर्ण पोलीस बळ…
अमळनेर तालुक्यात चोर तथा दंगलखोरांची मजल वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे अमळनेर पोलीस स्टेशनला असलेले अपूर्ण पोलीस बळ अमळनेर तालुक्याच्या आजच्या लोकसंख्येनुसार सुमारे १५० पोलिसांची आवश्यकता असून फक्त ७७ पोलीस बळ उपलब्ध आहेत आणि याची झळ सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. नागरिकांना आपल्यां जिवासह मालमत्तेचे संरक्षण करणे महाकष्टदाय ठरत आहे, कष्टाने कमविलेले धन व वस्तू चोरीला जात असल्याने चिंताग्रस्त होत आहे. परंतु या अपूर्ण पोलीस बळाच्या प्रश्नावरती एकही आजी-माजी लोकप्रतिनिधी शासन स्थरावर प्रयत्न करताना दिसत नाहीत. शेकडो कोटी रुपयांची कामे केले असल्याचे वल्गना करणारे सामान्य लोकांच्या सुरक्षिततेबाबत का प्रयत्नशील अथवा जागृत नाही ? नेमके याचे कारण काय ? असा प्रश्न उपस्थित होतो.
श्याम पाटील : शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.