अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचार सभेत पेरला विचार
अमळनेर मध्ये दरवेळी परिवर्तन होतंच हा इतिहास

अमळनेर : अमळनेेर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार देणे तसं खूप कठीण काम होते मात्र.. आता ही निवडणूक खूप सोपी झाली आहे. एकीकडे ‘बदमाश’ तर दुसरीकडे ‘बाणेदार’ लोक आहेत. जनतेत मुस्लिम द्वेष पेरला जातो आहे. भाजपने ईडी, सीबीआयच्या नावावर राज्यात पक्ष फोडले आणि हे एक कटकारस्थान आहे. विरोधकांजवळ ईडी, सीबीआय सर्व काही आहे. स्वाभिमानी लोकांजवळ संविधान आहे. त्या ताकदीचा वापर करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा संदर्भ देत सांगितले की, विरोधक जात आणि धर्म यांचे शत्रू आहेत. एकमेकांत भांडणे लावत आहेत. हुकूमशाही सुरु आहे. या हुकूमशाहीमुळे आपले स्वातंत्र्य धोक्यात असून ते रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. आपलं स्वातंत्र्य कोणाला अर्पण करु नका असा सल्ला शिवसेना उबाठा गटाचे उपनेते तथा सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी दिला. अमळनेर येथील साने गुरुजी हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. प्रचार सभेच्या व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जुगलजी प्रजापती, डॉ. बी. एस. पाटील, तिलोत्तमा पाटील, अमृता दास गुप्ता, ॲड. ललिता पाटील, रिता बाविस्कर, उमेश पाटील, प्रा. अशोक पवार, मनोहर नाना पाटील, मनोज पाटील, सचिन पाटील, श्याम पाटील, संदीप घोरपडे, प्रा. सुभाष पाटील, धनगर दला, बी. के. सूर्यवंशी, बन्सीलाल भागवत, गोविंदराव पवार यांचे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उपनेते तथा सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांना पुर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भेट देऊन तर डॉ. अनिल शिंदे यांना शेतकऱ्यांचे प्रतिक म्हणून नांगर भेट देऊन स्वागत करण्यात आले. अल्पसंख्याक सेल कडूनही किरण माने यांचा सत्कार करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन मन्ना शर्मा यांनी केले.
श्री किरण माने पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत तीन खतरनाक व्हीलन दिसले. अडीच वर्षातील महागाई, अन्याय, अत्याचार, बलात्कार आणि भ्रष्टाचाराच्या वाढत्या घटनांमुळे जनता संतापली आहे. अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊन अनेक बळी गेले. भ्रष्टाचार एवढा वाढला की.. नव्याने झालेल्या बुलेट ट्रेनसाठीचा पुल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही कोसळला. आता जाती जातीत भेद निर्माण करुन फुट पाडली जात आहे. द्वेष भावनेतून बटेंगे तो कटेंगे.. चा प्रसार होतो आहे. धर्म रक्तात काळजात असावा. समाजाची जाण असणारा नेता असावा. एका बाटलीत दारु आहे.. ज्यामुळे कुटुंबाची राखरांगोळी होईल तर डॉ शिंदे यांच्याकडील बाटलीत औषध आहे ज्यामुळे कोणाचाही जीव वाचवला जाईल. याचा मतदारांनी विचार करावा असेही सांगितले. तत्पूर्वी काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर हल्लाबोल केला.
- डॉ अनिल शिंदे मायभूमी व जनतेपुढे नतमस्तक…
- प्रचार सभेला भाषण सुरु करण्यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी माय भूमी अमळनेर व मतदार संघातील उपस्थित जनतेपुढे नतमस्तक होऊन विजयासाठी आशीर्वाद मागितला. मला यावेळी आमदार म्हणून संधी द्या.. मी दिलेले वचन पूर्ण करुन बारामती व शिरपूर प्रमाणे अमळनेरचा विकास निश्चितच करु असे आश्वासित केले. फक्त मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय असेल. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकदिलाने काम करीत असल्याचे डॉ. अनिल शिंदे म्हणाले.
ॲड. ललिता पाटील म्हणाल्या की, उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळ भरुन काढतात.. आम्ही तेच केले. महाविकास आघाडीचे सर्व लोक बरोबरीने उभे राहिले. मतदार संघात पंधरा वर्षांनी पंजा येतोय. कमळ आधीच गायब झाले.. आता घड्याळही गायब होईल. राज्यात १३५ बंडखोर उभे आहेत पण जनता हुशार झाली आहे. बळीराजाच्या औजारांवर, खतांवर जीएसटी लावला. उद्योगधंदे गुजरात ला नेले. त्यांनी आपल्याला काय दिले तर दोन डाकू. महिलांना सुरक्षितता नाही.. सगळं असुरक्षित. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोना काळात त्यांनी अनेकांचा जीव वाचवला. राजकारण केले नाही तर समाजकारण केले. ज्येष्ठ साहेबांना ‘भटकती आत्मा’ म्हटलं.. याची लाज वाटायला पाहिजे असा शाब्दिक टोला लगावला. अमळनेर मध्ये परिवर्तन होतंच हा इतिहास आहे. अमळनेरचे अर्थकारण, समाजकारण, राजकारण बदलविण्याकरीता महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन केले.
डॉ. बी. एस. पाटील म्हणाले की, आधी रामराज्य होतं.. आता महाभारत चालू आहे. पाच वर्षांत आमसभा नाही. शरद पवार साहेबांसारखा कोणी मायका लाल नाही. शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र टिकवून ठेवला. मनाने तरुण आहात तोपर्यंत माणूस म्हातारा होत नाही.
संदीप घोरपडे म्हणाले की, २०१४ ला आमदार म्हणून निवडून येताना तुम्ही जातीपातीचे राजकारण केलं मराठ्यांच्या प्रति विविध जाती धर्माचे लोकांच्या मनामध्ये विष पेरलं आणि सत्ता हस्तगत केली. कालांतराने जनतेच्या लक्षात आलं की, हा मराठा समाज सर्व जाती-धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा समाज आहे. या समाजाने कधीही कोणालाही हीन वागणूक दिली नाही. कधीही कोणाला दूर लोटला नाही. प्रत्येकाला आपल्या छातीशी लावलं आणि ही गोष्ट विविध समाजांना समजल्यानंतर त्यांनी दुसऱ्या वेळेस नंदुरबारला धोबीपछाड दिली. धोबीपछाड केल्याबरोबर यांना अमळनेर मधील नागरिकांचे प्रश्न, समस्या दिसेनात. साने गुरुजींच्या अमळनेरात ‘खरा तो एकची धर्म.. जगाला प्रेम अर्पावे’ हा आमचा एकच धर्म आहे. आमच्या विविध जाती, धर्म नाहीत. आमचा धर्म साने गुरुजींचा आहे. तुम्ही आम्हाला विकत घेऊ शकत नाही. आता डॉक्टर साहेबांचा विजय दूर नाही. अमळनेर मतदार संघात पुनर्जन्म होणार आहे.
संजय पुनाजी पाटील यांनी शहर विकासाच्या मुद्यावर बोट ठेवत.. नगरपालिका पाणीपट्टी १८०० रुपये असूनही गढूळ पाणी पाच दिवसांनी मिळते. शाश्वत विकास नाही. रोड व गावाच्या आजूबाजूला कमानी हा विकास नव्हे. ग्रामीण भागातील शेतकरी शिवछत्रपतींच्या काळामध्ये पहिली कर्जमाफी व सर्वांचे नेते पवार साहेब या देशाचे कृषिमंत्री असताना हजारो कोटीची दुसरी कर्ज माफी झाली. शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं उद्याचं मतदान हे आदरणीय शरदचंद्रजी पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राहुलजी गांधी यांना करणार आहात.
प्रा. अशोक पवार यांनी पाडळसे धरणाचा उहापोह केला. या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाआघाडी असा हा सामना आहे. महायुतीच्या माध्यमातून पैशांच्या मस्तीने पक्ष चोरले, फोडले, चिन्ह पळवले. शिंदेंनी अलीबाबा ४० चोर पळवून नेले. ज्या अजित दादांना पवार साहेबांनी अनेक ठिकाणी संधी दिली तेच जेलमध्ये जाण्याऐवजी सत्तेत जाऊन बसले. शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी महिलांसाठी रक्ताचं पाणी केलं. चौधरींवर बोलताना नंदुरबार पार्सल २०१४ ला निवडले.. भाजपचे सहयोगी सदस्य झाले. शेतकऱ्यांसाठी पाणी आणलं नाही पण दारु आणली. सुत गिरणी चे १८०० कोटी कुठे गेले ?.. ८ कोटींची कलाली योजना फेल गेली. पाणी विकत घ्यावे लागते. भाजप सरकारने उद्योगपतींचे कर्ज माफ केले पण शेतकरी, युवक यांचा विचार केला नाही. यामुळे विधानसभा निवडणुकीत पंजाला मत देऊन धडा शिकवावा.
याशिवाय जुगलजी प्रजापती, गोविंदराव पवार, प्रा. सुभाष पाटील, निळकंठ पाटील, तेली यांनीही विद्यमान सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह करुन अनेक मुद्दे समोर मांडले. या सरकारच्या काळात उद्योगधंदे गुजरात ला गेले.. १६ हजार शाळा बंद करुन शैक्षणिक नुकसान केले. एक काळ असा होता की, शिक्षणासाठी मुले इतर राज्यातून महाराष्ट्रात यायचे. आता मुला मुलींना शिक्षणासाठी इतर राज्यामध्ये जावे लागते. महागाई वाढली, शेतीमाल बि बियाणे महाग झाले, शेतीमालाला भाव नाही. परीक्षेचे पेपर फुटले. लाडकी बहिण योजना निवडणुकीवेळी का ? पूर्वी जनतेत विश्वास होता.. आता गद्दारी होते. ईडी लावली जाते. सरकार बदललं की बरेच काही दिसेल. दहा वर्षांत झालेल्या अन्यायाचा विचार करुन पंजा चिन्हावर मतदान करा, राग व्यक्त करा आणि डॉ शिंदे यांना अधिक मतांनी जिंकून आणा असे आवाहन केले.