अतिवृष्टीचे पंचनामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
उपविभागीय अधिकाऱ्यांकडे २९ गावांच्या वंचित शेतकऱ्यांची मागणी; न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

अमळनेर : अतिवृष्टी बाधित गावांना आदेशानंतरही पंचनामे न करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किसान काँग्रेस सह शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या आठ दिवसात न्याय न मिळाल्यास कोणत्याही स्वरूपाचे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावर्षी अमळनेर तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असून अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. किसान काँग्रेसच्या मागणीनुसार जिल्हाधिकारीनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी गावांप्रमाणे कर्मचारी नियुक्त करून पंचनाम्यांचे आदेश दिले होते. नुकतेच अतिवृष्टीचे ४० कोटी अनुदान प्राप्त झाले असून त्यात २९ गावे वगळली आहेत. अधिक माहिती घेतली असता या गावचे पंचनामेच झाले नाही व सादरही केलेले नव्हते. याबाबत तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात येऊन २९ गावांची व पंचनाम्यासाठी नियुक्त कर्मचार्यांच्या नावासह यादी सादर करून कारवाईची मागणी केली आहे.
हिंगोणे बुद्रुक, दापोरी खुर्द, मुंगसे, कामतवाडी, जवखेडे, निंभोरा, पिंपळी प्र. ज, हिंगोणे सिम प्र. ज, हिंगोणे खुर्द प्र. ज, सात्री, मेहेरगाव, दापोरी बुद्रुक, खेडीसीम प्र. ज, नांद्री, नालखेडे, रुंधाटी, धावडे, मुडी प्र. अमळनेर, खापरखेडे, गंगापुरी, धुरखेडा, अमळगाव, दोधवद, कलाली, पिंगळवाडे, पातोंडा, खवशी बुद्रुक, खवशी, मठगव्हाण, लोंढवे या २९ गावचे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. उपविभागीय अधिकारी नितिकुमार मुंडावरे याना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले , शिरस्तेदार जोशी, कृषी विभागाच्या वसुंधरा सावंत हजर होते. निवेदनावर प्रा सुभाष पाटील ,सुरेश पाटील ,धनगर पाटील ,डॉ अनिल शिंदे, रवींद्र बोरसे ,बन्सीलाल भागवत, अरुण देशमुख , प्रताप पाटील, रोहिदास पाटील, अनिल पाटील, सचिन पाटील, शाळीग्राम पाटील, आनन्दा पाटील, रामकृष्ण पाटील, श्रावण पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.