एकाच रंगमंचावर समाज जीवनावर आधारित हिंदी व मराठी नाट्य अभिवाचनाचा योग

‘खजुराहो का शिल्पी’ व ‘सखाराम बाईंडर’ चे नाट्य अभिवाचन

 

अमळनेर : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात काल दिनांक १६ मार्च रोजी डॉ. शंकर शेष लिखित ‘खजुराहो का शिल्पी’ व विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाईंडर’ चे नाट्य अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. एकाच रंगमंचावर हिंदी व मराठी नाट्य अभिवाचनाचा हा योग असावा. दोन्ही नाटकांतील बहुतांश कलाकार पेशाने शिक्षक असून रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी दोन्ही कलाकृतींचे दिग्दर्शन केले आहे. कार्यक्रमास मालेगाव येथील म. सा. गा. कॉलेजचे प्रा. डॉ. व्ही. डी. सूर्यवंशी व प्रताप महाविद्यालय अमळनेरचे प्रा. डॉ. रमेश माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. शंकर शेष लिखित ‘खजुराहो का शिल्पी’ हे हिंदी नाटक. एखादं शिल्प उभारताना शिल्पकार जीव ओतून काम करत असतो. त्या शिल्पातील कल्पकता गहन अर्थ समजून देत असते. या नाटकातून सद्यस्थितीत ठिकठिकाणी होत असलेली मंदिरे खरोखर कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. विषय कठीण असला तरी ज्या कोणाला माहिती नसावे त्याला या नाटकाचा वेगळा अनुभव मिळाला. या नाटकातील भूमिकेत.. महाराज : चंद्रकांत देसले, महाराणी पुष्पा : पूजा शाह, राजकुमारी अलका : मेघा पाटील, द्वारपाल व धर्मगुरू : दयाराम पाटील, कवीराज : बापूराव ठाकरे, शिल्पकार : सर्जेराव शिसोदे, चंडवर्मा : संदीप सूर्यवंशी, बासरीवादक : योगेश पाटील या कलाकारांचा सहभाग होता.

भूतकाळात तथाकथित स्त्रीवादी भूमिकेतून तथा सांस्कृतिक, सामाजिक समाज जीवनावर विपरीत परिणाम करणारं, विविध आरोप होऊन बंद केलं जातं अशा विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाईंडर’ या स्फोटक नाट्याचे अभिवाचनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. निळू फुले, लालन सारंग सारख्या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग १९७२ मध्ये केला. त्यावेळी कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शन केले होते. त्यावेळी या नाटकाविषयी प्रचंड गदारोळ उठला. या नाटकामुळे विवाहसंस्था धोक्यात येईल, नाटकात अश्लीलता वगैरेचा उहापोह झाला. सन १९७४ ला नाटकावर बंदी झाली. कोर्ट आदेश व कालांतराने पुन्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मध्यस्थीने नाटक सुरु झाले असा या नाटकाचा थोडक्यात इतिहास आहे. अमळनेर शहरात स्थानिक कलाकारांनी सत्तरच्या दशकात खळबळ माजवणाऱ्या या नाटकाची अप्रतिम कलाकृती सादर केली. या नाटकातील भूमिकेत.. सूत्रधार : भाऊसाहेब देशमुख, मुख्य भुमिकेत सखाराम बाईंडर : रामेश्वर भदाणे, दाऊद : दयाराम पाटील, बडतर्फ फौजदार : संदीप सूर्यवंशी, लक्ष्मी : पुजा शाह, चंपा : मेघा पाटील, मृदंग वादक : केतन जोशी या कलाकारांचा सहभाग होता.

एखाद्या व्यावसायिक नाटकाला अभिप्रेत व्यक्तिरेखा रंगमंचावर या मंडळींनी वठवली. आजही स्रीकडे बघण्याची भूमिका कोणती असावी आणि चुकीच्या नात्यांचा शेवट कसा होतो ? याच ज्वलंत उदाहरण म्हणजे हे आजचे नाट्य अभिवाचन.अमळनेरकर नाट्य रसिकांसाठी तो अनुभव म्हणजे अमूल्य भेट होती. तीन ते चार तासाचे नाटकाचा सारांश अवघ्या ३० ते ४० मिनिटांत सादरीकरण करणे सोपे काम नव्हते. प्रसंगी रसिक श्रोत्यांनी कलाकारांना भरभरून दाद दिली. नाट्य अभिवाचन साठी सर्वच कलाकारांनी महिनाभर घेतलेली मेहनत फलदायी ठरली. नाट्य अभिवाचनानंतर रसिक प्रेक्षकांशी झालेली चर्चा महत्वपूर्ण ठरली. मान्यवर प्रा. डॉ. रमेश माने यांनी चर्चेवेळी रसिकांच्या शंकेचे निरसन केले. या चर्चेचा पुढील काळात फायदा होणार हे निश्चित. कलेचा हा ठेवा जतन करण्यासाठी यापुढेही प्रेक्षकांची साथ हवी असेही ते म्हणाले.

 

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!