‘श्री मंगल जल सेवा‌’ चे उद्घाटन संपन्न; अमळनेरकरांसाठी शुद्ध, ओझोनयुक्त पेयजल सेवा सुरु

अमळनेर : शहरातील नागरिकांसाठी एक अद्वितीय व आरोग्यवर्धक सुविधा म्हणून ‌‘श्री मंगल जल सेवा‌’चे उद्घाटन माजी नगराध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते नुकतेच दि.१८ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, धुळे रोड, अमळनेर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मंगळ ग्रह संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले व ज्येष्ठ पत्रकार राजकुमार छाजेड यांनी केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोविंदादा मुंदडे, मोहनशेठ ओस्तवाल, बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, अर्बन बँकेचे संचालक प्रविण जैन, संचालक समाधान धनगर, डॉ. किशोर शहा, प्रा. के. डी. पाटील, खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक हरी भिका वाणी यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक करताना डॉ. डिगंबर महाले म्हणाले की, आगामी काळात मंगळग्रह सेवा संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहरातील व्यापारी, राजकीय नेते यांच्या संयुक्त विद्यमाने शहरवासियांसाठी अल्पदरात दर्जेदार चहा, नास्ता व जेवणाची सोय केली जाणार आहे. शिवाय गरजूंना रास्त दरात घरपोच डब्याची सोयदेखील केली जाणार आहे.

‌‘श्री मंगल जल’ ची वैशिष्ट्ये….श्री मंगल जल ही सेवा अमळनेर शहरात अद्याप कोठेही उपलब्ध नसलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. या पाण्यात खालील विशेष बाबींचा समावेश आहे.

  • ओझोनयुक्त जल : पाण्यात ओझोन मिसळल्याने ते अधिक स्वच्छ, निर्जंतुकीकृत आणि ऑक्सिजनयुक्त होते. हे पाणी दीर्घकाळ टिकते आणि आरोग्यवर्धक असते. तसेच याच पाण्याने फळे-भाजीपाला धुतल्यास तेही अधिक स्वच्छ व सुरक्षित बनतात.
  • अमेरिकन मेंब्रेन तंत्रज्ञान : जलशुद्धीकरणासाठी उच्च प्रतीचे अमेरिकन मेंब्रेन वापरण्यात आले आहेत, जे क्षार, विषाणू, जीवाणू व इतर घातक घटक पूर्णपणे नष्ट करतात.
  • चिलिंग मशीनद्वारे थंड पाणी : शरीराला घातक केमिकल्स न वापरता केवळ चिलिंग मशीनच्या साहाय्याने पाणी थंड केले जाते.
  • ॲक्टिवेटेड चारकोल व चांदीचा धूप : नारळाच्या कवट्यांपासून तयार केलेला चारकोल व त्यावर दिलेला चांदीचा धूप पाण्याची दुर्गंधी पूर्णपणे दूर करतो व नैसर्गिक गोडवा निर्माण करतो.
  • फ्लोराईड निर्मुलन : हाडे ठिसूळ करणारे फ्लोराईड यामधून पूर्णपणे काढून टाकले जाते, जे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
  • ब्यूटी वॉटरसदृश उपयोग : श्री मंगल जलाने चेहरा धुतल्यास त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.
  • अत्यल्प दरात सेवा सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध

शहरातील कृषी उत्त्पन्न बाजार समिती, प्रताप महाविद्यालय, सुभाष चौक, पैलाड, बसस्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज गार्डन आदी ठिकाणी एटीएम प्रणालीद्वारे श्री मंगल जल केवळ १ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध करण्यात आले आहे. याशिवाय, २० लिटरचे गार पाणी अत्यंत दर्जेदार जारमध्ये फक्त २० रुपयांमध्ये घरोघरी, दुकाने, कार्यालये, शाळा, रुग्णालये अशा सर्व ठिकाणी मोफत वितरणसेवा दिली जाणार आहे. सामाजिक सेवाभावी संस्थांसाठी व पाणपोई चालविणाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात पाणी पुरविले जाणार आहे.‌ ‘श्री मंगल जल सेवा‌’ हा अमळनेर शहरासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून नागरिकांच्या आरोग्यास प्राधान्य देत गुणवत्तापूर्ण व सुरक्षित पाण्याची हमी देणारा उपक्रम ठरला आहे. यामागील सेवाभाव, विज्ञानाधिष्ठित दृष्टीकोन आणि अत्यल्प दरातील सुविधा ही या प्रकल्पाची खरी ओळख ठरणार आहे.

उद्घाटनप्रसंगी अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, संचालक प्रविण जैन, खा.शि. मंडळ संचालक योगेश मुंदडे, आदर्श फोटोजचे संचालक हेमंत पवार, सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील, शरद सोनवणे, जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल, प्रितपालसिंग बग्गा, प्रशांत सिंघवी, प्रसन्ना जैन, प्रितम मणियार, अनिल रायसोनी, डॉ. किशोर शहा, अनिल कदम, विशाल शर्मा, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी डी. ए. सोनवणे, आनंद महाले, पुषंद ढाके, व्ही. व्ही. कुलकर्णी तसेच व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!