
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील मराठी विभाग आणि वक्तृत्व व वादविवाद समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयातील पूज्य साने गुरुजी सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या विविध ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान, पर्यावरण, निसर्ग, शिक्षण, संस्कृती यांसारख्या विविध विषयांवर आपली मते प्रभावी शैलीत मांडत श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.
या स्पर्धेमध्ये अखिलेश पाटील याने प्रथम, सायली पाटील हिने द्वितीय तर दिव्या वडनेरे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. रमेश एन. माने व प्रा. नितीन एस. पाटील यांनी केले. स्पर्धेच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, वक्तृत्व एक कौशल्य असून ते प्रत्येक विद्यार्थ्यांने आत्मसात केले पाहिजे. हे कौशल्य आत्मविश्वासाबरोबरच जगण्याच्या सर्वच क्षेत्रात धाडस निर्माण करणारे शस्त्र आहे, असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेतून अधिकाधिक सहभाग घेऊन अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
स्पर्धेच्या शेवटी परीक्षक प्रा.नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व स्पष्ट मांडणीचे विशेष कौतुक करत, वक्तृत्व हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे जेष्ठ उपप्राचार्य डॉ.योगेश तोरवणे, डॉ.अनिल झळके, डॉ.विलास गावित, प्रा.गोपाळ बडगुजर हे सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख वक्तृत्व व वादविवाद समितीचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. सहसंयोजनात प्रा. तुषार पाटील व प्रा. सागर सैंदाणे यांचे महत्वाचे योगदान होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. सागर सैंदाणे यांनी केले. महाविद्यालयात पार पडलेली ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वृद्धीसह त्यांचा बौद्धिक विकास घडवणारी ठरली.