ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्यात तरुणाई एकवटली; ‘गाव तेथे एनएसयूआय शाखा’ उपक्रम राबविणार

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : देशातील लोकशाही संस्था, निवडणूक प्रक्रिया, सामाजिक न्याय, शेतकरी, दलित, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहे, ‘अमळनेर ही लढवय्यांची भूमी आहे. स्वातंत्र्य चळवळीत जळगाव जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अन्यायाविरोधात लढण्याची परंपरा या भूमीत आहे. आजची तरुणाई उद्याचा इतिहास लिहिणारी आहे,’ असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भाऊसाहेब आजबे यांनी व्यक्त करत युवकांना संघर्षाची प्रेरणा दिली. अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी ॲड. कौस्तुभ सुनिल पाटील यांची निवड झाल्यानंतर नुकताच पदग्रहण सोहळा येथील मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम) चे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) चे अध्यक्ष धनंजय चौधरी, माजी जि. प. सदस्य शांताराम बापू पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, ज्येष्ठ नेते धनगर पाटील, सुरेश पिरण पाटील, श्वेता पाटील, राजेंद्र भाट, रज्जाक शेख, महेश दगडू पाटील, बन्सीलाल भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना संदीप घोरपडे यांनी ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या विद्यार्थी चळवळीतील संघर्षमय वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्था, रोजगार, संघटन बांधणी आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर उपस्थित मान्यवरांनी भूमिका मांडली. पुढील काळात युवकांनी संघर्षासाठी पुढे येण्याचे आवाहनही केले. यामुळे, युवकांच्या उत्साहाला नवे बळ मिळाले. मान्यवरांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांना पदभार सोपवून सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान…
दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. नीट, टीईटी आणि इतर परीक्षांमधील पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील ताण यावरुन लक्षात येते. बेरोजगारी, स्थानिक प्रश्न, वाळू धोरण, कायदा-सुव्यवस्था आणि इतर राजकीय घडामोडी, विविध सार्वजनिक प्रश्न आहेत. यावर त्यांनी सरकारवर टीका करत आपली भूमिका मांडली. पक्षफोडीवर बोलताना आधी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून चिन्ह देखील पळवले. प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले पण तेथे सितामाईच नसेल तर काय अर्थ. तेथे पूजा कोणी घातली ? हे सर्वांनाच ठाऊक आहे. तेथील दान देखील सुरक्षित नाही. भगव्या कपड्यात येऊन सितामाईला पळवणारे चोर.. असा संदेश पूर्वी वाल्मिकी नी रामायणातून दिला होता. आज तशी पुनरावृत्ती होताना दिसून येते. याचा भाजपाला शाप लागल्याशिवाय राहणार नाही असे परखड मत मांडत सरकार अपयशी ठरले असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटात भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘क्रांती तरुणाईच घडवते हा इतिहास आहे : ॲड. कौस्तुभ पाटील
‘खरी क्रांती तर कॉंग्रेसच्या काळात झाली. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना देशासाठी प्राण गमवावे लागले. अगदी कमी तरुण वयात संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, २१ व्या वर्षी भगतसिंग यांनी बलिदान दिले. भारतामध्ये अनेक धर्माचे लोक आहेत. समता, समानता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांचा अंगीकार राज्यघटनेने केलेला आहे. आपल्या घटनाकारांनी भारतीय राज्यघटना अधिकाधिक सर्वसमावेशक आणि सर्वधर्म समभाव असलेली असावी, यासाठी प्रयत्न केले. पण आज परिस्थिती वेगळी आहे.. पुन्हा नव्याने क्रांती करण्याची गरज आहे यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. अमळनेर ही साने गुरुजी, प्रताप शेठ आणि काँग्रेसच्या समृद्ध परंपरेची भूमी असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसला उतरती कळा लागली असे काही जण म्हणत असले तरी.. नव्या पिढीच्या माध्यमातून पक्षाला पुन्हा बळ मिळेल. संघर्ष करण्याची आमची तयारी आहे आणि ही तरुणाईच परिवर्तन घडवेल,” असे सत्काराला उत्तर देताना सांगितले.
‘विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज, शिष्यवृत्ती अर्ज आणि विविध शैक्षणिक प्रक्रिया १ जुलैपासून एनएसयूआयच्या माध्यमातून पूर्णपणे विनामूल्य भरून देण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. “गाव तेथे एनएसयूआय शाखा” हा उपक्रम राबवून प्रत्येक गावात युवकांचे संघटन उभारले जाईल आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला जाईल, अशी ग्वाही दिली.
जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी युवकांच्या बळावर पक्ष अधिक सक्षम होईल. युवक हेच काँग्रेसचे भवितव्य असून विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचे सांगितले.
“संघटन विस्तार हाच यशाचा मंत्र” असून युवकांनी गावागावात संघटना विस्ताराचे काम करण्याचे आवाहन जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम) चे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांनी केले. श्वेता पाटील यांनी सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर एनएसयूआय काम करीत आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना संघटित करून त्यांना प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करतील, अशी भूमिका मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका बारी यांनी केले तर महाजन सर यांनी आभार मानले. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील विद्यार्थी, युवक यांची मोठी उपस्थिती होती. साहजिकच पदग्रहण सोहळा युवकांच्या संघटनशक्तीचे आणि काँग्रेसच्या नव्या नेतृत्वावरील विश्वासाचे शक्तिप्रदर्शन ठरले. युवकांनी संघटित होणे आवश्यक आहे. अॅड. कौस्तुभ पाटील सारख्या अभ्यासू, संघर्षशील आणि संघटनक्षम नेतृत्वामुळे जिल्ह्यात युवकांची मोठी फळी तयार होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी ॲड. कौस्तुभ पाटील यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.