संबधीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्पुरती साखळी चैन रिलींग लावण्याचे काम सुरू करण्याचे दिले आदेश

अमळनेर : शहराचे वैभव व नेहमी वर्दळ असलेला दगडी दरवाजाचा बुरुज ढासळला आहे. सध्या संरक्षणासाठी मुरूमच्या गोण्या लावण्यात आलेल्या आहेत. अशाही परिस्थितीत तेथूनच वाहनांची वर्दळ असते. या ढासळलेल्या बूरूजामूळे भविष्यात कोणतेही नुकसान होवू नये म्हणून घाट रस्त्यांवर ज्या पध्दतीने साखळी चैन रिलींगचे काम होते त्या पध्दतीचे काम येत्या चार दिवसात सुरू करण्यात येणार असून संरक्षणासाठी लावलेल्या मुरूमच्या गोण्या काढून रस्ता रहदारीसाठी मोकळा करण्यात येईल अशी माहिती खा.उन्मेष पाटील यांनी नुकतीच पत्रकारांशी बोलतांना दिली.

यासंदर्भात आपण पूरातत्व विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचित केले असून त्यासाठी तात्पूरता लागणारा निधी खासदार निधी अथवा जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. नाशिक पूरातत्व विभागाचे अधिकारी विराट सोनटक्के यांचेशी संपर्क केला असता, राज्याच्या पूरातत्व विभागाकडे चालू वर्षातील बजेटमध्ये निधीत ३० टक्के आर्थिक तूट असल्याने अमळनेर येथील दगडी दरवाजाच्या प्रस्तावित कामाला लागणारे १ कोटी ७५ लाख रूपयांचे काम पुढील आर्थिक वर्षात मार्च नंतरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली.
या परिसरातील नगरसेविका सौ.कल्पना चौधरी यांच्या सासूंचे निधन झाल्याने खा.उन्मेष पाटील हे द्वार दर्शनाला आले होते. त्यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी ही समस्या त्यांना सांगितली. स्वतः खा.पाटील दगडी दरवाजा परिसरात वाहतूक कोंडीत सुमारे १५ मिनटे अडकले होते. ही समस्या दररोजची असल्याचे माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी सांगीतले. त्यावर खा.पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी करुन संबधीत अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून तात्पुरती साखळी चैन रिलींग लावण्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, भाजपाचे माजी जि.प. सदस्य अँड व्ही.आर.पाटील, झुलाल पाटील, पंडीत चौधरी, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील, बाळासाहेब संदानशिव, धनू महाजन आदी उपस्थित होते.