देवगांव देवळी येथील म.फुले हायस्कूल मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे यांच्या वतीने विद्यार्थीे प्रबोधन

अमळनेर : आज समाजात अंधश्रद्धांचे प्रमाण वाढलेले असून शिक्षित समाजात प्रमाण जास्त आहे. सावित्रीबाई फुले यांनी कधीही कर्मकांड व उपासतापास केले नाहीत. कोणत्याही अंधश्रध्देला बळी न पडता देशातील महिला शिक्षित झाली पाहिजे यासाठी फुले दाम्पत्यांनी आपले आयुष्य वेचले. श्रध्दा असावी पण अंधश्रद्धा नसावी असे मत संस्थेच्या तारादूत अर्चना सोनवणे यांनी व्यक्त केले. त्या देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्या वतीने विद्यार्थीे प्रबोधन कार्यक्रमात बोलत होत्या. व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, आय.आर.महाजन, एस.के.महाजन होते. कार्यक्रमात तारादूत सोनवणे यांचा सत्कार नववीतील नेहा पाटील हिने केला.
अर्चना सोनवणे पुढे म्हणाल्या की, आजही स्त्रीला दुय्यम लेखले जाते. स्त्री-पुरुष समानता म्हटले जाते पण पाहिजे तसे पहायला मिळत नाही. समाजात अंधश्रद्धा कशा पसरतात ते उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना पटवून दिले. शासन हागणदारी मुक्तीसाठी अनुदान देते पण तेच अनुदान इतरत्र खर्च केले जाते. उघडयावर शौचाला बसून आपले आरोग्य धोक्यात आणले जाते. शौचालयाचा वापर करण्यासाठी त्यांनी आवाहन केले. ताराबाई शिंदे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, संत गाडगेबाबा यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीयुक्त सहभागातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर.महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरविंद सोनटक्के, एच.ओ.माळी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.