
मुंबई : २६ जानेवारीपासून प्रत्येक शाळेत परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची तत्वे रुजविण्याची गरज आहे. त्यासाठीच सरकारने मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. तसेच परिपाठातले इतर विषय वगळण्यात आले आहेत. राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दररोज परिपाठ घेतला जातो. या परिपाठातले विषय शाळा ठरवत असते. आता २६ जानेवारीपासून शाळेच्या परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये आघाडी सरकारने असाच कायदा केला होता मात्र त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांची रुजवण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.