
अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथील डेव्हलपमेंट ॲग्रो व्हिजन शेतकरी उत्पादक कंपनीला आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत घरपोच शेत वस्तू व भाजीपाला पोहचविण्याची परवानगी देण्यात आली आहे. तहसील कचेरी चे आवारात आमदार अनिल पाटील यांनी भाजीपाला मोजून आमदार स्मिता वाघ यांनी तो खरेदी करून या विक्री केंद्राचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे शेत मालाची वाहतूक बंद आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे अडचणीचे झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना बि बियाणे, खते, कीटक नाशके, भाजीपाला, फूड पॅकेट्स पुरवणे आवश्यक असल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी टाकरखेडा येथील डेव्हलपमेंट ॲग्रो व्हिजन शेतकरी उत्पादक कंपनीला १४ एप्रिल पर्यंत जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरविण्यास परवानगी दिली आहे.
विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तालुका कृषी अधिकारी भारत वारे, बाजार समिती सभापती प्रफुल्ल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, आत्माचे समन्वयक भूषण पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष व उत्पादक कंपनीचे संचालक हिरालाल पाटील यांचेसह तुषार पाटील, रमेशगीर गोसावी, रामदास पाटील, भटू पाटील, नथ्थू पाटील, मधुकर पाटील, गोकुळ पाटील, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील, किरण अहिरे आदी उत्पादक कंपनी संचालक व कर्मचारी हजर होते.