नवी दिल्ली : दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा केंद्रातील ५० लाख कर्मचाऱ्यांना तर ६५ लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली. नव्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२ टक्क्यांवरुन १७ टक्के झाला आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात आली असून या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
