
अमळनेर : जिल्हाधिकारी कार्यालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिनांक १५ जुलै २०२० रोजी मा.जिल्हाधिकारी, जळगांव यांना शहर व ग्रामीण भागातील कोरोना योध्दांचे मानसिक खच्चीकरण थांबविण्याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनास माजी आमदार ‘कृषिभूषण’ साहेबराव पाटील यांनी समर्थन दिले आहे. त्यांनी दिनांक १६ जुलै रोजी पत्र पाठवून सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र झटणा-या कोणत्याही कोराना योध्यांवर कारवाई करू नये अशी विनंती मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, अमळनेर शहर व ग्रामीण भागात आजपर्यंत ५२० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ३८६ म्हणजे ७४.२३% रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. दुर्दैवाने यातील ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत १०३ रुग्ण अमळनेर, जळगांव इतर शहरात खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुरुवातीच्या काळात अमळनेरचा मृत्यू दर अधिक होता परंतू आज अखेर मृत्यू दर ५.९६ % झालेला आहे शिवाय जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग अपवाद वगळता (नियंत्रण अधिकारी), विविध विभागांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अमळनेर शहरातील सामाजिक कार्य करणारे नामवंत डॉक्टर, नगरपरिषद, लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून हा मृत्यूदर कमी करण्यात यश मिळविले आहे. अमळनेर भाग अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संबंधी करावयाच्या उपाययोजनांबाबत, कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी कामाचे ३३ ठिकाणी वर्गीकरण करुन प्रत्येक ठिकाणी नियंत्रण अधिकारी, पर्यवेक्षण अधिकारी कर्मचारी आणि कामाचा तपशिलानुसार त्यांनी नियुक्त केलेले (सार्वजनिक बांधकाम विभाग-नियंत्रण अधिकारी वगळता) सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र झटत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी त्यांच्या कार्याला सलाम करून त्यांचे समर्थन करतो अश्या स्थितीत या योध्दांचे मानसिक संतुलन विचलीत/ खच्चीकरण होवू नये. सध्याची परिस्थिती लक्षात घेता,आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र झटणा-या (सार्वजनिक बांधकाम विभाग नियंत्रण-अधिकारी वगळता)कोणत्याही कोराना योध्यांवर कारवाई करू नये अशी विनंती पत्रातून केली आहे.
